डोंबिवली : दर रविवारी ते आपल्या लाडक्या श्वानाला अंघोळ घालण्यासाठी दावडी तलाव परिसरात यायचे. आज ही दोघे बहिण भाऊ तलावाच्या ठिकाणी श्वानाला घेऊन आले. श्वानाला अंघोळ घालत असताना बहिणीचा पाय सरकून ती पाण्यात पडली. बहिणीला वाचवायला भाऊ गेला तोही पाण्यात बुडू लागला.
त्यांना वाचविण्यासाठी तो पाळीव श्वान जोर जोरात भूंकत होता. परंतु आजूबाजूला जास्त लोक नसल्याने उशीर झाला. गावातील एका व्यक्तीचे त्याकडे लक्ष गेले, पाण्यात कोण तरी बुडत आहे असे समजताच ग्रामस्थ गोळा झाले.
अग्निशमन दल, मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र उशीर झाला होता. पाण्यात बुडाल्याने भाऊ बहिणीचा मृत्यु झाल्याची घटना दावडी तलाव परिसरात घडली असून किर्ती रविंद्रन (वय 17) आणि रणजित रविंद्रन (वय 22) अशी दोघांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात किर्ती व रणजीत हे कुटूंबासह राहतात. त्यांचे आई वडिल गावी गेले असून सध्या दोघेच भाऊ बहिण येथे रहात होते. त्यांच्याकडे पाळीव श्वान असल्याने दर रविवारी ते दावडी येथील तलावात जात असत.
आज ही ते नेहमीप्रमाणे श्वानाला अंघोळ घालण्यासाठी तलाव परिसरात गेले होते. तलावाच्या काठी खडकावर आपली दुचाकी उभी करुन ते खाली उतरले. दुपारी 12 च्या सुमारास श्वानाला अंघोळ घालत असताना किर्तीचा पाय घसरला आणि ती तलावातील पाण्यात पडली. किर्तीला वाचवण्यासाठी रणजितने पाण्यात उडी घेतली.
ते दोघे ही बुडू लागल्याने जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. त्यांची धडपड पाहून श्वान तलावाच्या काठावर उभे राहून भूंकत होता. परंतू आजूबाजूला दुपारच्या वेळी नागरिकांची फारशी वर्दळ नव्हती. अखेर एका ग्रामस्थाने श्वान का भूंकत आहे हे पाहण्यासाठी आला असता तलावात कोणी तरी बुडत असल्याचे त्याला दिसून आले.
त्यांनी लागलीच ग्रामस्थांना त्याची माहिती दिली. गावातील पोलीस पाटील गजानन पाटील यांनी त्वरीत मानपाडा पोलिस आणि पलावा अग्निशमन दलास याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलाव परिसरात त्यांचा शोध घेतला असता किर्ती व रणजित यांचे मृतदेह अग्मिशमन दलाच्या जवानांच्या हाती लागले.
दोघांचे मृतदेह मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून याचा अधिक तपास करीत आहेत. रणजित हा एमबीबीएसचे शिक्षण घेत असून तो यंदा शेवटच्या वर्षाला होता. तर किर्ती ही बारा वी ला गेली होती. त्यांचे आई वडील हे गावी गेले असून त्यांना याची माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तो गाडीच्या पाठी पळत होता...
किर्ती आणि रणजित यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान पाण्यात घेत होते. यावेळी काठावर त्यांचा पाळीव श्वान सतत भुंकत त्यांना शोधत होता. त्याचे भूंकणे पाहून उपस्थित साऱ्यांचेच मन हेलावत होते. किर्ती व रणजित यांचे मृतदेह हाती लागल्यावर ते रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. रुग्णवाहिका सुरु होताच श्वानही त्या गाडीच्या पाठीमागे धावू लागला. त्याला काही नातेवाईकांनी धरुन ठेवले होते. किर्ती व रणजित यांची दुचाकी नेण्यात आली त्या दुचाकीच्या पाठीही श्वान धावू लागला. श्वानाची ती केविलवाणी धडपड पाहून उपस्थितांच्या नजरा पाणावल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.