धोकादायक इमारतींचा प्रश्न कधी सुटणार? अन्यथा आठ दिवसानंतर कठोर भूमिका; वाचा सविस्तर...

old building
old building

नवी मुंबई : मुंबईत गुरूवारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संक्रमण शिबीर आणि विविध कागदोपत्रांअभावी पुनर्बांधणीचा एकही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. अशा अवस्थेत शहरातील धोकादायक इमारत मुंबईप्रमाणे कोसळण्याची प्रशासनाने वाट पाहायची का? धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचे काय?, या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या वास्तव्याचे काय? शहरात संक्रमण शिबीराच्या नियोजनाचे काय? असे अनेक नवी मुंबईत प्रलंबित आहे.

अशा अनेक प्रश्नांवरून बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. म्हात्रे यांनी आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसांत उपाययोजना करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर प्रशासनाने प्रश्न न सोडवल्यास पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारवरही घणाघाती टीका केली. पुनर्बांधणीसाठी वारंवार सरकार आणि प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही महापालिका, सिडको आणि सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे अशा सरकारचा आणि सरकारी आस्थापनांचा आपण निषेध करतो, असा संताप म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. म्हात्रे यांनी शिष्यमंडळासोबत बांगर यांची घेतलेल्या भेटीत शहरात संक्रमण शिबीर उभारण्यावर भर दिला. 

इमारत कोसळणे, नैसर्गिक आपत्ती येणे असे प्रसंग उद्भवल्यास बाधित लोकांना राहण्याची महापालिकेने पर्यायी व्यवस्था केली आहे काय? असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच पामबीच रस्त्याच्या कडेला काही अनधिकृत इमारती पडीक अवस्थेत आहेत. या इमारतींमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींमधील नागरिकांची पर्यायी व्यवस्था होऊ शकते, असे काही पर्याय म्हात्रे यांनी महापालिकेला सूचवले. कोरोनाच्या महामारीत नागरीकांच्या इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही म्हात्रे यांनी प्रशासनाला बजावले. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी येत्या आठ दिवसांत प्रशासनाने तोडगा काढावा अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागेल असे इशारा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला. 

पुनर्बांधणीच्या कामात काळेबेरे
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या कामात आर्थिक लागेबांधे असल्याने काहीतरी काळेबेरे होत असल्याचा आरोप बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. पुनर्बांधणीचे काम एकाला मिळू नये म्हणून दुसरा सतत पाय खेचत असतो. एखाद्या पदपथाचे चार वेळा काम केले जाते मग मोडकळीस आलेल्या इमारतींचे काम का करता येत नाही, असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com