मुंबईकरांची पुरातून सुटका! मिठी नदीसाठी BMC चा मास्टरप्लान, 'विहार'चे पाणी वळणवार
Vihar Lake Mumbai Bhandup Pumping Station
मुंबई : मुसळधार पावसामुळे मिठी नदीला पूर येतो. त्यामुळे नदीच्या पुराचे पाणी वस्त्यांमध्ये घुसून पूरस्थिती निर्माण होते. मिठी नदीच्या पूरमुक्तीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून पावसाळ्यात विहार तलावातील ओसंडून वाहणारे पाणी भांडुप जल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये वळवण्यात येणार आहे. यामुळे मिठी नदीमुळे होणारी पूरपरिस्थिती टाळणे शक्य होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, समुद्राची मोठी भरती असल्यास मुंबईत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. मिठी नदीच्या पात्रात ओसंडून वाहणाऱ्या विहार तलावातील पाण्यामुळे आणखीण भर पडते. या तिन्ही घटना एकत्रितपणे घडल्यास मिठी नदीलगतच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यावर उपाययोजना करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार विहार तलावातून ओसंडून वाहणारे पाणी भांडुप जल शुद्धीकरण प्रकल्पात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही तांत्रिक अडचणी असून त्यातून मार्ग काढण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार मिठी नदीतील अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. याशिवाय उदंचन केंद्रदेखील उभारावे लागणार आहे. त्यानुसार महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सध्या नदीमधील पुराच्या पाण्याचे वहन करण्यासाठी २०० द.ल.लि. क्षमतेच्या उदंचन केंद्राच्या बांधकामाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच यानंतर जलवाहिन्या टाकण्यात येतील. या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण २० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यासह पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मुख्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे.
लवकरच मोऱ्यांची पुनर्बांधणी
महापालिकेच्या ए विभागातील पिसे पांजरापूर संकुल येथील महापालिकेच्या हद्दीतील मुख्य जलवाहिन्यांच्या सेवा रस्त्यालगत अस्तित्वात असलेले जुने दगडी पूल आणि मोऱ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली होती. सध्या प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.
प्रकल्पामुळे रहिवाशांना दिलासा
मिठी नदीला आलेल्या पुरामुळे परिसरामध्ये पाणी घुसते. त्याचा फटका सिप्झ, मरोळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल यासह कुर्ला परिसरातील बैलबाजार आणि क्रांतीनगर या भागाला बसतो. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर या परिसरात एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज ठेवाव्या लागतात. खबरदारी म्हणून बऱ्याचदा या परिसरातील लोकांचे स्थलांतरही करावे लागते. अशात विहार तलावातील पाणी वळवण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.