Mumbai Metro News: मेट्रोच्या वेळेत होणार वाढ; मुंबईकरांना दिलासा
Navi Mumbai Metro: लापूर- पेंधर मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत लवकर वाढ करण्यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. सध्या मेट्रो रात्री दहा वाजेपर्यंत धावत असून लवकरच ती बारा वाजेपर्यंत धावेल, असे संकेत सिडकोकडून दिले जात आहे.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करणाऱ्या नवी मुंबईकरांची वाहतूक समस्या दूर होणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी सिडको महामंडळाने मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर नवी मुंबई मेट्रो रेल्वेची सेवा सुरू केली होती. या मेट्रोसेवेला तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या चार महिन्यात जवळपास १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. तर मेट्रोच्या तिजोरीत तिकीट विक्रीतून सुमारे तीन कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, नवी मुंबई मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सुरू आहे.
रात्री दहानंतर मेट्रोची सेवा बंद केली जाते. त्यात खारघर रेल्वे स्थानकावर रात्री दहानंतर बससेवा उपलब्ध होत नसल्यामुळे सेक्टर ३४, ३५ तसेच तळोजावासीयांना खासगी अथवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. यासाठी त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री बारापर्यंत मेट्रोची वेळ वाढवावी, अशी मागणी तळोजावासीयांकडून केली जात होती.
नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोकडून लवकरच मेट्रोच्या वेळेत वाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. सिडको अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी आणि इतर सर्व यंत्रणेचा विचार करून रात्रीच्या वेळेत एक तास वाढ करण्याचे नियोजन सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
तिकीट दर होणार कमी
खारघर आणि तळोजामधील वाढत्या लोकसंख्येमुळे मेट्रोला अधिक पसंती मिळेल, असे सिडकोला वाटत होते. मात्र, तिकीट दर जास्त असल्यामुळे मेट्रोने दैनंदिन १२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे.
विशेष म्हणजे, मुंबई परिसरातील मेट्रोचे भाडे एक ते तीन किलोमीटरसाठी दहा रुपये, तीन ते बारा किलोमीटरसाठी २० रुपये आणि १२ ते १८ किलोमीटरसाठी ३० रुपये आकारले जात आहे. मात्र, तळोजा फेज दोनमधील रहिवाशांना मेट्रोने प्रवास केल्यास खारघर स्थानक गाठण्यासाठी बेलपाडा स्थानकापर्यंत ३० रुपये मोजावे लागत आहे. तळोजावरून एनएमएमटीच्या वातानुकूलित बसने प्रवास केल्यास २५ रुपये मोजावे लागत आहे.
तर एनएमएमटीच्या साध्या बसने प्रवास केल्यास अंदाजे १७ रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ व्हावी, यासाठी सिडकोकडून पेंधर ते बेलापूरदरम्यान मेट्रो भाडे कमी करण्यासंदर्भात विचार-विनिमय सुरू असल्याचे समजले.
स्थानकावर लवकरच खाण्याचे स्टॉल नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सिडकोने २,९५४ कोटी रुपये खर्च केले आहेत. मेट्रोचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवासी संख्या जैसे थे असून मेट्रोच्या उत्पनात वाढ व्हावी, यासाठी काही स्थानकावर खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलसाठी परवानगी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ व्हावी, यासाठी प्रवासी तसेच काही संघटनेकडून पत्र प्राप्त झाले आहे. मेट्रोच्या वेळेत वाढसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. - प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.