Railway News: गर्दीमुळे शेकडो प्रवाशांची गाडी सुटली; कारभारावर संताप
Railway News: प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणाऱ्या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण, रत्नागिरीसाठी एकही विशेष गाडी सोडली नाही.
परिणामी शनिवारी दिवा रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकातील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढताच आले नसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे पनवेलच्या प्रवाशांना केवळ गाडी समोरून जाताना बघावे लागत असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
रेल्वे प्रशासनाने ८ मार्चपासून सुरू केलेल्या दिवा-रोहा-चिपळूण मेमू स्पेशलला १५ मार्चपासून अचानक ब्रेक लावल्याने चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चाकरमान्यांसाठी दादर- चिपळूण स्वतंत्र विशेष गाडी चालवावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे काही दिवसांपूर्वी दिले होते.
तसेच दिवा-रोहा-चिपळूण मेमू रद्द केल्यास गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार असल्याची पूर्वकल्पनाही दिली. मात्र, या निवेदनाकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
कोंकण विकास समितीने विनंती करूनही दादर चिपळूण गाडी अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे सध्या मुंबईतून खेड, चिपळूण, रत्नागिरीकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. त्यामुळे ही गर्दी लक्षात घेत ३१ मार्चपर्यंत मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरीसाठी स्वतंत्र गाड्या सोडण्यात येण्याची मागणी कोंकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.