अरे बापरे! पावसाळा ठरणार कोरोनासाठी पोषक? सरकारकडून समन्वय समितीची स्थापना

rains.
rains.

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून पाऊस सुरू होण्यापूर्वी कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका असल्याने कोरोना संसर्ग अधिक फोफावण्याचा धोका आहे. त्यामुळे साथीच्या आजारांशी निपटण्यासाठी सरकारने समन्वय समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून समितीच्या माध्यमातून लोकांसाठी दवाखान्याची व्यवस्था केली जाणार आहे.

यंदा पावसाळा 5 जूपर्यंत सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्यात अनेक साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत यासाठी शासन आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यासह संपूर्ण देशात सध्या 31 मे पर्यत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे या रेडझोन भागातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात पावसाळा अवघ्या 15 दिवसांवर आल्याने या कालावधीत कोरोनावर नियंत्रण मिळवावे लागेल. पावसाळ्यात  साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने काहीही करून पावसाळ्यापूर्वी कोरोनावर नियंत्रण कसे मिळवावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईमध्ये दाटीवाटीच्या झोपड्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापर्यत जर ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आरोग्य यंत्रणेवर विशेष ताण पडेल. या सर्व गोष्टीचा विचार करता मे महिना संपण्यापूर्वी रुग्णसंख्या नियंत्रणात आणावी लागणार आहे.

मुंबईत पाऊस सुरू झाला की अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, अतिसार अर्थात जुलाब, टायफाईड, साथीचा ताप, कॉलरा, लेप्टोस्पायरासिस, पोटाचा संसर्ग, कावीळ हे सर्व आजार हे पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषत: लहान मुले, वृद्धांची या दिवसात काळजी घेणे आवश्यक  असते. कोरोना या विषाणूला पावसाळ्यामध्ये पूरक असे वातावरण असते. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की हवेतून पसरणारे जंतू वाढतात. त्यामुळे साथीचे आजारही वाढतात, असे महाराष्ट्र अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

मुंबई-पुण्यासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे
मुंबई- पुण्यासाठी पुढचे पंधरा दिवस हे खूप महत्वाचे आहेत. पुढच्या पंधरा दिवसात जर नव्याने लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले तर आणि हे प्रमाण रोखू शकलो तर जूनच्या पहिल्या आठवड्या पर्यत परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल. याचमुळे सरकारनेही 31 मे पर्यंत लॉकडाऊन घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र रुग्णवाढीचा वाढता आकडा पाहिला तर येत्या 15 दिवसात ही रुग्णवाढ नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन साथीचे आजार पसरलेच, तर त्याच्याशी सामना करण्यासाठी सरकारने समन्वय समितीची स्थापना केली असून त्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणा तयार ठेवली जाणार आहे.

मोठी बातमी ः चर्चगेट येथील सनदी अधिकाऱ्यांची इमारत सील  

यंदा 96 ते 100 टक्के पावसाचा अनुमान
सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकीकडे राज्य सरकारसमोर कोरोनाचे संकट असताना यंदा पाऊस देखील जूनच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत 96 ते100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com