कोल्हापूर विमानतळ प्रवाशांनी 'का' घातला गोंधळ...

Indigo Flight Cancel On Kolhapur Airport Tirupati To Kolhapur Marathi News
Indigo Flight Cancel On Kolhapur Airport Tirupati To Kolhapur Marathi News

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता उड्डाण होणाऱ्या तिरुपतीसाठीच्या विमानाची फेरी रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी झालेल्या गोंधळामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तब्बल तासाभराच्या वादावादीनंतर दुपारी सुमारे ३५ प्रवाशांना खासगी मोटारीतून बेळगाव विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून चेन्नई, हैदराबादला जाणाऱ्या विमानांनी पाठविले. तेथून पुढे तिरुपतीपर्यंतचा प्रवास मोटारीतून करावा लागला. ही व्यवस्था कंपनीकडून करण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.

कोल्हापूर विमानतळावरून तिरुपती सेवा गेल्या दीड-दोन महिन्यापासून सुरू झाली आहे; मात्र अनेक वेळा ही सेवा अचानक रद्द होते. ‘पैसे परत घ्या..’ असे सांगून कंपनीकडून हात वर केले जातात. तसेच अनेक वेळा हवामानाचे आणि धुक्‍याचे कारण दिले जाते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सुमारे ५० हून अधिक प्रवासी तिरुपतीला जाणार होते. प्रवाशांना सकाळी मोबाईलवर एसएमएस आले, त्यानुसार विमानाचे उड्डाण काही वेळेसाठी लांबल्याचे सांगण्यात आले.

एक तासानंतरही विमानाचा पत्ताच नाही

विमानतळावर जमलेल्या ५० प्रवाशांमध्ये डॉक्‍टर, वकील, सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, महिला, लहान मुले यांचाही समावेश होता. काही प्रवाशांचे ‘कनेक्‍ट फ्लाईट’ होते. सातारा, कोल्हापूर, पुणे अशा परिसरातून या विमानासाठी प्रवासी आले होते. नियोजित वेळेनंतर साधारण एक तासानंतरही विमानाचा पत्ताच नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, इंडिगो कंपनीच्या एका महिला अधिकाऱ्याने विमान रद्द झाल्याचे सांगून प्रवाशांच्या मनस्तापात भर घातली.

प्रवाशां झाले संतत्प

विमान रद्द केल्याचे जाहीर करताच प्रवाशांनी कंपनीच्या तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काही प्रवाशांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रोखण्यासाठी पोलिसांना बोलावले. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद थांबविला. मात्र, संतापलेल्या प्रवाशांनी तिरुपती येथील दर्शनाचा पास, लॉजिंग बोर्डिंग, परत येण्याचे विमान तिकीट याचीही नुकसानभरपाई मागितली. तर काही प्रवाशांनी बुकिंगचे पैसे परत घेऊन विमानतळावरून काढता पाय घेतला.

तिरुपतीपर्यंतचा प्रवास खासगी वाहनातून

मात्र सातारा-पुणे आदी परिसरातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिरुपतीला पोहोचविले पाहिजे, असा अट्टहास धरला. अखेर दुपारी एक खासगी बस या प्रवाशांना घेऊन बेळगावकडे निघाली. मात्र, त्या बसमध्ये बिघाड असल्यामुळे सुमारे पस्तीस प्रवाशांना वेगवेगळ्या मोटारीतून बेळगावला पोचविण्यात आले. तेथून हे प्रवासी चेन्नई, हैदराबाद अशा वेगवेगळ्या विमानातून पुढे पाठविण्यात आले. विमान प्रवासानंतर तिरुपतीपर्यंतचा प्रवास खासगी वाहनातून देण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे प्रवाशांनी सांगितले.

देशभरातील अनेक विमानतळांवर अशा घटना घडत असतात

हैदराबादहून कोल्हापूरला आलेले विमान पुढे तिरुपतीला जाणार होते; मात्र त्याला कोल्हापुरात येण्यास उशीर झाला. हवामानातील बदलानुसार इंडिगो कंपनीने तिरुपती विमान फेरी रद्द केली. प्रवाशांना वेगवेगळे पर्याय दिले. त्यानुसार काहींना पैसे परत केले. काहींना बेळगाव, पुणे येथून पर्यायी व्यवस्था दिली आहे. कोल्हापूरच नव्हे, तर देशभरातील अनेक विमानतळांवर अशा घटना घडत असतात. दरम्यान, याबाबत एकाही प्रवाशाची तक्रार माझ्यापर्यंत पोचलेली नाही.
- कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ

चुकीच्या कारणाचा आरोप...
चंद्रकुमार पारेख (सातारा), रविशंकर बिराजदार, भोसरी (पुणे), ॲड. पूनम गुजराती (कोपरगाव), डॉ. भारती कटवा (पुणे) यांनीही रद्द झालेल्या विमानसेवेचा प्रचंड मनस्ताप झाल्याचे सांगितले. वारंवार या विमानाचे उड्डाण रद्द होणार असल्यास ती सेवा बंद करावी, अशी मागणी ‘सकाळ’कडे केली. तसेच हवामान खराब असल्याचे चुकीचे कारण दिले जात होते; मात्र इतर विमानांचे उड्डाण होत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com