कोल्हापूर - ठराविक वयानंतर अनाथ मुलांना संकुलातून बाहेर पडावे लागते. त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह उच्च शिक्षण कसे घ्यायचे, कौशल्य असूनही व्यवसायाला भांडवल कोठून आणायचे, रोजगार कसा मिळवायचा, अशा प्रश्नांचा डोंगर उभा असतो. अशा वेळी त्यांना मानसिक बळ, आधार देण्याच्या उद्देशाने संकुलातून बाहेर पडलेल्या १५ तरुण- तरुणींनी ‘स्नेह संवर्धन सामाजिक बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली आहे. त्या माध्यमातून अनाथ मुलांचे भविष्य घडविण्याचा मानस आहे.
संकुलात अनाथ निराधार मुलांना एक परिवार मिळतो. वयाची १८ ते २१ वर्षे कशी निघून जातात ते समजत नाही. अशा मुलांना संकुलातून बाहेर पडावे लागते. परिवाराला मुकावे लागते. विविध समस्या, प्रश्नांचा समाना करावा लागतो.
आज स्पर्धा वाढली आहे. आई-वडिलांचा आधार असणाऱ्या मुलांनाही स्थिरस्थावर होण्यासाठी तिशी ओलांडावी लागते. यापूर्वी संकुलातून बाहेर पडलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे असणारे तरूण तरुणी एकत्र आले. त्यांनी संकुलातून बाहेर पडणाऱ्या आताच्या मुलांचे काय होत असेल याचा विचार केला. यातूनच सुभाष नारे आणि राजेश चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून या मुलांना बळ देऊया अशी संकल्पना मांडली. त्याला सर्वच मित्रपरिवाराची संमती मिळाली. यातूनच ‘स्नेह संवर्धन सामाजिक बहुउद्देशीय संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
संकुलातून ठराविक वयानंतर बाहेर पडलेल्या मुलांच्या पाठीशी ही संस्था एक परिवार म्हणून उभी राहणार आहे. त्यांचे उच्च शिक्षण, त्यासाठी आरक्षण कोट्यातून प्रवेश, शिष्यवृत्ती, वस्तीगृहाची सुविधा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजगारासाठीचे प्रयत्न, व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ, बॅंकेतील कर्ज मिळवून देणे, शासकीय कोट्यातून घरे मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्याबरोबर शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना यासाठी लागणारा कायमस्वरुपी पत्त्याची अडचणही संस्था सोडविणार आहे.
हेच १५ तरुण- तरुणीं
अनाथ मुलांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबर त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्था काम करणार आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी सुभाष नारे, रूपाली नारे, भूषण बापट, सचिन माने, अमोल घुणके, आशा शेटे, शुभांगी काकडे, सुनील मंगसुळे, अर्चना बनगे, सुनीता नांगरे, गुरू पाटील, भिकाजी ढवणे, अझरुद्दीन मुल्ला, अझरुद्दीन पटेल, गणेश पाटील ही संकुलातून बाहेर पडलेली मुले पुढे आली आहेत.
संकुलातून बाहेर पडणाऱ्या मुलांना स्वतःच्या पायांवर उभे करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था या मुलांच्या पाठीशी एक परिवार म्हणून उभी राहणार आहे.
- सुभाष नारे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.