Bedag gao News : बेडग गाव पुरोगामी विचारांचे आहे. इथले सगळ्या जाती-धर्माचे लोक कित्येक पिढ्यांपासून गुण्योगोविंदाने नांदत आले आहेत. या गावाला जातीवादी ठरवण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार, असा इशारा देत आज बेडगसह मिरज पूर्व भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
बेडगचे सरपंच उमेश पाटील, उपसरपंच संभाजी नागरगोजे यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा १५ दिवसांत मागे घ्या, अन्यथा मुंबईला मंत्रालयावर धडक मारू, असा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या प्रकरणाची फेरचौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. गावातील तरुणांनी आजच गुन्हा मागे घेतला जावा, अशी मागणी करत ठिय्या मांडला.
बेडगसह मिरज पूर्व भागातील शेकडो लोकांचे जथ्थे सकाळी अकरापासून मिरजेच्या दिशेने येत होते. बेडगपासून सांगलीपर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरज शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा क्रीडा संकुलापासून मोर्चा सुरु झाला. शिवराय, महात्मा बसवेश्वर यांचे फोटो असलेले भगवे झेंडे, पिवळे झेंडे, पंचरंगी झेंडे घेऊन तरुण सहभागी झाले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
पंचायत समितीचे माजी सदस्य अमर पाटील यांनी मोर्चासमोर गावकऱ्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, ‘‘आमचे बेडग पुरोगामी गाव आहे. या गावाची राज्यात बदनामी केली जात आहे. आम्ही सगळे एकत्र गोडीगुलाबीने राहणारे लोक. बारा बलुतेदार, अठरा पडग समाज एकत्र राहतो, नांदतो. या गावात कमान उभारण्याचा निर्णयसुद्धा संमतीने झाला. ही कमान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या नावाची करायचे ठरले. त्यासाठी ग्रामपंचायतीने विविध स्तरावर मान्यतेसाठी पाठपुरावा सुरा केला. तोवर इकडे अचानक कमानीचे बांधकाम सुरु करण्यात आले.
त्यांना तीनवेळा नोटीस दिली. त्याला न जुमानता काम सुरु ठेवले. ग्रामपंचायतीने कायदेशीर प्रक्रिया केली. त्यात काय जातीवाद केला? डॉ. महेश कांबळे यांनाही विनंती आहे, त्यांनी डोक्यातून गैरसमज काढावा. बेडगला बदनाम करू नये. गावाला डिवचू नये. आम्ही इथे ताकद दाखवायला आलो नाही, आमचा आवाज ऐकला गेला नाही म्हणून आलो आहोत. आजवर आरोप सहन केले, त्याचा अर्थ घारबलो असा घेऊ नका. आम्ही संविधानाचा सन्मान करतो.
पंधरा दिवस देऊया
ज्येष्ठ नेते संभाजी पाटील म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी बाजू समजून घेतली आहे. त्यांनी अवधी मागितला आहे, या प्रकरणावर पुन्हा सविस्तर माहिती घेऊन ते निर्णय देतील. पंधरा दिवसांत गुन्हा मागे घेतला नाही तर थेट मुंबईला चालून जावू. मंत्रालयावर धडक देऊ.’’ परशुराम नागरगोजे म्हणाले, ‘‘बेकायदा कमान पाडणे हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा ठरतो? कमान पाडली शासकीय यंत्रणेने, मग गुन्हा सरपंच, उपसरपंचांवर का? ही काय पद्धत आहे.’’
यावेळी मल्लू कंगुने, सुजित लकडे, बापू बुरसे, दिलीप बुरसे, मिरज पूर्व भागातील दीपक शिंदे, तानाजी पाटील, गणेश देसाई, बी. के. पाटील, दीपक सावंत, रणजीत सावंत, संतोष पाटील आदी सहभागी होते.
डॉ. महेश कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदवा
बेडगसह पूर्व भागातील मान्यवर नेत्यांनी डॉ. महेश कांबळे यांच्यावर हल्लाबोल केला. बेडगचे सगळे गावकरी एक आहेत, आमच्यात कधीच मतभेद नाहीत, मात्र बाहेरचे लोक येवून विष कालवत आहेत, असा गंभीर आरोप करत डॉ. कांबळे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. या प्रकरणी डॉ. कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.