चंदगड तालुक्यातील हत्तीचा प्रश्न सुटणार कधी ?

Elephant Issue In Chandgad Taluka
Elephant Issue In Chandgad Taluka

चंदगड ( कोल्हापूर ) - हत्तींचे महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून चंदगड आणि कोकणची ओळख निर्माण झाली आहे. हत्तीच्या महाराष्ट्रातील वावराला आता दीड दशकाचा काळ उलटला आहे. या कालावधीत चंदगड तालुक्‍यात हत्तींच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला, तर कोट्यवधी रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे. हत्ती प्रवण भागात हा प्रश्‍न संवेदनशील होत असून, याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

सुरवातीच्या काळात हत्ती हा लोकांसाठी धार्मिक आणि मनोरंजनाचा विषय होता. 2004 च्या उन्हाळ्यात आलेले हत्ती पावसाळ्यात माघारी परतले आणि आता ते पुन्हा परतणार नाहीत, असा समज करून सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला, परंतु पुढच्या वर्षी पावसाळा संपताच पुन्हा हत्तींचे आगमन झाले. हा क्रम गेली पंधरा वर्ष सातत्याने सुरूच आहे.

सुगीच्या तोंडावरच कळप दाखल

ऐन सुगीच्या तोंडावर शिवारात दाखल होणारे हत्तींचे कळप पिकांचे नुकसान करीत आहेत. शेतातील घरे, बैलगाड्या, खळ्यावर रचून ठेवलेले धान्य आणि गवताच्या व्हळ्या लक्ष केल्या जात आहेत. मधल्या काळात जीवितहानी झाली. त्यामुळे त्रस्त झालेला शेतकरी रस्त्यावर उतरला. वनविभाग, शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून आश्‍वासनांचे इमले रचले गेले. विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. या भागातील हत्ती पकडून त्यांना पुन्हा कर्नाटकात नेऊन सोडणे, हत्ती खासगी मालकीत येऊ नये म्हणून जंगलाला प्रतिबंधक चर मारणे, विजेच्या किंवा सौर तारेचे कुंपण करणे आदी उपायोजना सुचवल्या गेल्या. शेतकऱ्यांसमोर स्वप्नरंजन निर्माण केले गेले. काही भागांत वनसंपत्ती तोडून हत्ती प्रतिबंधक चर मारण्यात आला; परंतु हे उपाय फेल गेल्याचे स्पष्ट होत आहे. तिलारी भागात हत्तींसाठी अभयारण्य करण्याचे आश्‍वासनही असेच हवेत विरले आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात नुकसानभरपाईचे पंचनामे करणे आणि भरपाई देण्यामध्ये दिरंगाई होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

भविष्यात संघर्षाची चिन्हे 
सोमवारी (ता.11) खामदळे व गुडवळे खालसा येथील ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात हत्तीमुळे निर्माण झालेले प्रश्‍न हेच अग्रस्थानी होते. सातबारा उतारे मिळवण्यासाठी तलाठी सज्जावर सापडत नाही. कर्मचारी पंचनाम करण्यासाठी वेळेत येत नाहीत. वर्ष उलटले तरी नुकसानभरपाई मिळत नाही. या त्यांच्या तक्रारी होत्या. नुकसानभरपाईही प्रचलित बाजारभावाप्रमाणे मिळायला हवी ही आग्रही मागणी आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शेतकरी आणि वन विभाग यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. प्रश्‍न चिघळण्यापूर्वी तो सोडवायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com