काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिवसानिमित्त नागपूरला महारॅली होणार आहे. यासाठी देशातील १० लाख कार्यकर्ते एकत्र येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर : ‘भारतीय जनता पक्षाने (BJP) तीन राज्यांत जरी विजय मिळवला असला तरी महाराष्ट्रात त्याचा उपयोग होणार नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळणार नाही असे त्यांच्या लक्षात आले आहे. विजयाचा विश्वास नसल्यानेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची भाजप फोडाफोडी केली. जिल्ह्यात ते विकास संकल्प यात्रा काढतात, मात्र त्या रथासमोर भाजप कार्यकर्ते सुद्धा नसतात,’ अशी खरमरीत टीका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी भारतीय जनता पक्षावर केली.
जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या महारॅलीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले, ‘नागपूरला होणाऱ्या महारॅलीतून लोकसभेचे रणशिंग फुंकले जाईल. शिवसेना, राष्ट्रवादी फोडल्याचा राग लोकांच्या मनात आहे. तो लोकसभा निवडणुकीतून व्यक्त होईल.
तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जरी भाजपच्या बाजूने असले तरी महाराष्ट्रात त्याचा उपयोग होणार नाही. हे माहिती असल्यानेच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण केले. महायुतीची कल्पना लोकांना पटलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. यापूर्वी त्यांनी ‘इंडिया शायनिंग’ असा प्रचार केला होता. त्याचे काय झाले हे सर्वांनी पाहिलेच. आज गावागावांत त्यांनी विकास संकल्प यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या स्वागताला भाजप कार्यकर्तेही नसतात. राज्यातील तीन पक्षांचे सरकार एका दिशेने जात नाही.
जनतेला ठोस देण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळेच जातीय ध्रुवीकरण करून मते घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, हे आता जनतेला कळले आहे. जानेवारीत लोकसभेसाठी काँग्रेसचे जागा वाटप होईल. राज्यातील २५ ते ३० जागा काँग्रेस लढवेल.’ या वेळी आमदार पी. एन. पाटील, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, बाजीराव खाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संजय पोवार, तौफिक मुल्लाणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही. यावेळच्या हिवाळी अधिवेशनात असे काय झाले की त्यांना फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागणार आहे. त्यांना माहिती आहे, मार्चमध्ये लोकसभा आचारसंहिता लागेल. म्हणूनच त्या तोंडावर हे अधिवेशन घेऊन त्यांना मराठा समाजाची दिशाभूल करायची आहे,’ अशी टीका सतेज पाटील यांनी केली.
‘काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिवसानिमित्त नागपूरला महारॅली होणार आहे. यासाठी देशातील १० लाख कार्यकर्ते एकत्र येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासाठी २६ डिसेंबरपासूनच स्वतंत्र बसची व्यवस्था केली असून तालुक्यांमधून या बसेस रवाना होतील’, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.