Loksabha Election : इचलकरंजी महापालिकेत शुकशुकाट; नागरिकांची वर्दळ थांबली, अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसह विविध निवडणूक प्रक्रियेतील कामे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपवली आहेत.
इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आचारसंहिता लागू झाल्यानंतर इचलकरंजी महापालिकेतील (Ichalkaranji Municipal Corporation) वर्दळ थांबली आहे. बहुतांश कर्मचारी निवडणूक प्रक्रियेच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांत शुकशुकाट जाणवत आहे. दुसरीकडे ३१ मार्चला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती दाखल करण्यासाठी आवश्यक नकाशे, कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. हरकत दाखल करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्याची मुदत संपली. त्यानंतर लगेचच निवडणूक आचारसंहिता लागली. तत्पूर्वी, महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आता मात्र वर्दळ थांबली असून महापालिकेतील वातावरण आतापासूनंच शांत-शांत होत आहे. विविध कामांनिमित्त येणाऱ्या राजकीय नेतेमंडळी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा राबता आता थांबला आहे.
याशिवाय निवडणूक अत्यावश्यक सेवा वगळता प्रक्रियेकडे बहुतांशी कर्मचारी जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प होणार असून, नेहमी वर्दळ असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांत हळूहळू शांतता दिसण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसह विविध निवडणूक प्रक्रियेतील कामे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपवली आहेत. भरारी पथकांसह तपासणी नाक्यावरही अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिकेत शांतता असणार आहे.
घरफाळा वसुलीवर परिणामाची शक्यता
सर्वसाधारणपणे ३१ मार्चपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर भर दिला जातो. या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाते. अखेरच्या काही दिवसांत तर कठोर कारवाई केली जाते. आता निवडणुकीच्या कामात बहुतांश कर्मचारी व्यस्त असणार आहेत. त्यामुळे घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.