
सोलापूर : राज्याचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणाचाच दबाव नव्हता, परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतीमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेत मी स्वत:हून राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण माजी मंत्री राठोड यांनी दिले. दुसरीकडे विरोधकांनीही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. घटनेची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावे म्हणून मी राजीनामा दिल्याचेही ते म्हणाले.
बंजारा समाजाच्या सहविचार सभेच्या निमित्ताने आमदार राठोड हे आज सोलापुरात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. राठोड म्हणाले, राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या अंदाजित दीड कोटींपर्यंत आहे. 288 विधानसभा मतदारसंघापैकी 72 मतदारसंघात समाजाची निर्णायक ताकद आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, या आशेने आमचा लोकशाही मार्गाने लढा सुरु आहे.
बंजारा समाजाला स्वातंत्रपूर्व काळापासून न्याय मिळालेला नाही. समाजातील तरूणांच्या भवितव्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे 25 मागण्या घेऊन आम्ही दौरे करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारच्या अखत्यारितील मागण्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितला असून त्यांनी लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले.
चारवेळा मोठ्या मताधिक्याने माझा विजय
समाजकारण व राजकारणात मी मागील 30 वर्षांपासून काम करीत आहे. चारवेळा आमदारकीची निवडणूक जिंकली असून यापूर्वी युतीच्या काळात मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री म्हणून मला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संधी दिली होती.
मात्र, चुकीच्या आरोपामुळे मी स्वत:हून राजीनामा दिला. पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल की नाही, हे मला माहिती नाही. परंतु, विधानसभेच्या चार निवडणुकांमध्ये माझे मताधिक्य वाढत गेले असून 50 टक्क्यांपेक्षा अधिक फरकाने माझा विजय झाल्याचेही संजय राठोड यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
समाजाच्या प्रमुख मागण्या...
- व्हीजेएनटीचे स्वतंत्र मंत्रालय असावे; समाजासाठी स्वतंत्र सबलीकरण योजना असावी
- बंजारास समाजासह 14 जातींसाठी स्वतंत्र एससी-बी प्रवर्ग तयार करावा
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये बंजारा समाजासाठी प्रत्येकी 20 जागा असाव्यात
- बाटी, सारथीच्या धर्तीवर वसंतराव नाईक यांच्या नावाने स्वतंत्र संस्था उभारावी
- परदेशी शिक्षण व इंग्रजी शाळांमधील प्रवेशात समाजासाठी विशिष्ट जागा असाव्यात
- वसंतराव नाईक महामंडळाला एक हजार कोटी द्यावेत; तांडा वस्ती सुधार योजनेत बदल करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.