
Solapur News: '...म्हणून जुळ्या बहिणींनी केलं एकाच मुलाशी लग्न'
आपण कायमच एखाद्या विवाहाच्या चर्चा करत असतो किंवा त्या ऐकत असतो. त्याचं कारण असतं फोटो, जेवण, नवरी, नवरा आणि इतर गोष्टी परंतु या लग्नाची चर्चा होण्याचं कारण जरा वेगळचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज याठिकाणी एक वेगळाच विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहेत. उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केलं आहे. हा अनोखा विवाह सोहळा अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे पार पडला आहे.
मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तीघी आजारी होत्या. अतुलने त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची त्याने काळजी घेतली. त्यांनी घेतलेली काळजी आणि दाखवलेला आपलेपणा यामुळे पिंकीला अतुल आवडू लागला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु या दोघी कधीच वेगळ्या राहिल्या नव्हत्या त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
रिंकी आणि पिंकी या दोघीही इंजिनियर असून त्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचे शिक्षणही एकत्रित झाले आहे. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या आहेत. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत लग्न केले आहे. या अनोख्या विवाहाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.