
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! महिलांना 'भरोसा' अन् 'शक्ती'ही मिळेना
सोलापूर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा पारित झाला. दुसरीकडे प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत भरोसा सेल (महिला सुरक्षा कक्ष) कार्यरत आहे. तरीही, शहर असो वा ग्रामीण भागात नवविवाहितेच्या छळाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. माहेरून पैसे आण, लग्नात मानपान केला नाही, मुलगा होत नाही, वांझोटी आहेस, खानपान व्यवस्थित येत नाही, अशा कारणातून विवाहितेचा छळ केला जात आहे. दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल एक हजार 900 पर्यंत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
हेही वाचा: 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान 'या' वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार
पोलिस ठाण्यातील भरोसा (महिला सुरक्षा कक्ष) सेलच्या माध्यमातून पती-पत्नींना समज देऊन संसार जोडण्याचा प्रयत्न होतो. पण, बहुतेक प्रकरणात पुन्हा त्यांच्यातील वादविवाह वाढल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे महिलांवरील अन्याय थांबविण्याच्या दृष्टीने महिला आयोगाच्या माध्यमातून ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: एक मुलगी, अनेकांसोबत जमविले विवाह! सांगोला, साताऱ्यातील तरुणांना फसवणारे जेरबंद
माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ
सोलापूर : विवाह झाल्यानंतर एका वर्षांनी सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक द्यायला सुरवात केली. गर्भवती असतानाही त्यांनी उपाशीपोटी ठेवले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. व्यवसायासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून छळ केला. माहेरून पैसे आणले नाहीतर नांदवणार नाही, अशी दमदाटी केली. माझ्या परस्पर माहेरून दोन लाख रुपये आणले आणि आता आणखी एक लाख रुपये आण म्हणून त्रास दिला, अशी फिर्याद मनिषा अभिषेक दरगड (रा. सम्राट चौक) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार पती अभिषेक राजगोपाल दरगड, सासू प्रेमा राजगोपाल दरगड, सासरा राजगोपाल हिरालाल दरगड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कांबळे हे करीत आहेत.
हेही वाचा: आणखी काही दिवस खबरदारी घ्या! सोलापूरसह चार तालुक्यातून कोरोना हद्दपार
विवाहितेला पाजले गोचिड मारण्याचे औषध
सोलापूर : काहीही कारण नसताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासरच्यांनी छळ केला. गोचिड मारण्याचे औषध पाजले, हाताला चटके दिले. हुंडा म्हणून बोरमाळ, गंठण, नेकलेस असे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व हजार रुपये घेतले. त्यानंतर ट्रॅक्टरचे हप्ते भरण्यासाठी वडिलांकडून पैसे घेऊनही त्यांना दोन लाख रुपये परत दिले नाहीत. तरीही, त्यांनी काहीतरी कारण पुढे करून त्रास दिला, अशी फिर्याद सिमरन आदम मुल्ला (रा. सनतनगर, लिमयेवाडी) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. त्यावरून पती आदम मुल्ला, सासू गुडमा मुल्ला, दिर आसिफ मुल्ला (सर्वजण रा. इंचगिरी, ता. इंडी), नणंद समीना गच्छीनमाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन मंद्रूपकर हे करीत आहेत.
हेही वाचा: उन्हाळा सुट्टीतही भरणार शाळा! निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक
पतीकडून पत्नीला बेदम मारहाण
सोलापूर : घरगुती भांडणातून पतीने पायाला व हाताला लाकडी फळी व स्टम्पने मारहाण केली. त्यामध्ये हात फॅक्चर झाला असून पायाला टाके पडल्याची फिर्याद सोनाली रविंद्र पुजारी (रा. कुमठे) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यानुसार पती रविंद्र सन्मुख पुजारी याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, नांदवायला तयार नसल्याने सोनाली या सासरी जाऊन सासूला त्याचा जाब विचारत असताना पतीने जबर मारहाण केली. त्यानंतर मार्च रोजी सैफुल पोलिस चौकीला गेले, पण त्याठिकाणी कोणीच नव्हते. त्रास होऊ लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन पुन्हा त्या घरी परतल्या. त्यावेळीही मारहाण करीत पती म्हणाला, आता तू कोर्टातूनच घरी यायचे, असेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, मला काही झाल्यास सासू व नणंद जबाबदार असेल, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. अधिक तपास सहायक फौजदार श्री. काळे हे करीत आहेत.
हेही वाचा: थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नोटीस! आता 'सिबील'वर पीक कर्ज
पतीसोबत झालेल्या भांडणामुळे दोन मुलांना घेऊन पत्नी बेपत्ता
सोलापूर : पतीसोबत झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून रविवार पेठेतून दोन मुलांना घेऊन पत्नी घरातून निघून गेली आहे. दहा आणि बारा वर्षांच्या दोन मुलांना पत्नी गायब झाल्याने तिच्या नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला. पण, त्यांचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी अखेर जेलरोड पोलिस ठाणे गाठले. त्या तिघांचा आता शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे अक्कलकोट रोडवरील नितीन नगरातून एक महिला घरातील कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिस आता तिचाही शोध घेत आहेत.
हेही वाचा: झेडपीवर 21 मार्चपासून प्रशासक! पंचायत समित्यांची मुदत 13 मार्चपर्यंतच
जेवणावरून विवाहितेला मारहाण
सोलापूर : येथील कुमठा नाका परिसरातील महाराणा प्रताप झोपडपट्टीतील काजल अक्षय पंतुवाले यांनी सासरच्या छळाला कंटाळून विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. सर्वकाही व्यवस्थीत असतानाही जेवणखान्याच्या किरकोळ कारणातून पतीने बेलन्याने तर इतरांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद त्यांनी दिली. त्यानुसार पती अक्षय पंतुवाले, नणंद पिंकी मनसावाले, वैशाली बिलोरीवाले (सर्वजण रा. महाराणा प्रताप झोपडपट्टी, कुमठा नाका) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस नाईक मणुरे हे करीत आहेत.
Web Title: Women Are Being Harassed By Their Fatherinlaw For Dowry They Want The Implementation Of The Bharosa Cell And Shakti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..