पिंपरी : कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने त्याचा ताण विविध भागांतील स्मशानभूमीवर पडू लागला आहे. विशेषतः निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत सर्वाधिक मृतदेह आणले जात आहेत. विद्युतदाहिनीमध्ये मृतदेह जाळण्यासाठी रुग्णवाहिकांच्या रांगा स्मशानभूमीत लागल्या आहेत. या अतिरिक्त ताणामुळे विद्युतदाहिनी मध्येच बंद पडत असल्यामुळे मृतदेहालासुद्धा अंत्यविधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात गेल्या १५ दिवसापासून कोरोनाचे अक्षरशः तांडव सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या १५ दिवसात ५०० मृत्यू झाला आहे.
या कठीण परिस्थितीत शहरातील प्रमुख स्मशान भूमीवर मोठा ताण वाढला आहे. लोकसंख्येच्या गरजेनुसार शहरात १५ विद्युतदाहिन्यांची आवश्यकता आहे. पण सध्या फक्त ७ विद्युतदाहिन्या कार्यरत आहेत. त्यामुळे निगडी आणि पिंपरी या दोनही दाहिन्यांवर मोठा ताण पडत आहे. आपल्या शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागातील कोरोना लागण झालेले रुग्ण चांगल्या उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल होतात, त्यातील अनेक रुग्णांची स्थिती ही अत्यवस्थ असते. त्यांचाही अंत्यविधी नियमाप्रमाणे विद्युत दाहिनीमध्ये करावा लागतो. असा शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील प्रमुख विद्युत दाहिणींनवर पडत आहे.
निगडी, भोसरी आणि पिंपरी ह्या तीन ठिकाणी प्रमुख दाहिण्या सध्या शहरात कार्यरत आहेत. त्यात गेल्या १८ वर्षांपासून निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिन्या न थांबता सतत कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे या दाहिनीमध्येच बंद पडण्याचा प्रकार सध्या घडत आहे. गुरुवारी (ता.१५) ३ तास एक दाहिनी बंद होती. दर आठ तासाला सरासरी १२ मृतदेह निगडी स्मशान भूमीतील दाहिन्यांमध्ये दाखल होत आहेत. गेल्या १५ दिवसात ५०० पेक्षा जास्त मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाले. दिवस-रात्र मृतदेह जाळल्यामुळे ‘‘बिडाच्या चिमणीने’’ (धुरांडे)दम टाकला आहे. त्यातच नुकतीच एक चिमणीही बदलण्यात आली.
अशा कठीण काळात परगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशान भूमीत मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, तेजस सापरिया, विजय मुनोत व समिती अध्यक्ष विजय पाटील मात्र तत्परता दाखवत माणुसकी जपत आहेत.त्यांना धीर देऊन अंतविधीसाठी मदत करत आहेत. समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ‘‘सध्या निगडीमधील ‘‘अमरधाम’’ चे दृश्य अतिशय विदारक आहे. मृतदेह एक कडेला आणि नातेवाईक दुसऱ्या बाजूला ताटकळत असतात. दाहिनी बंद पडल्यावर प्रतीक्षेत अजूनच भर पडते. महापालिकेने तातडीने अजून एक विद्युतदाहिनी उभी करणे अत्यावश्यक आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.