

Cockroach Janata Party
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
कॉक्रोच जनता पक्ष हा सोशल मीडियावर व्यक्त झालेला उद्रेक असून प्रत्यक्ष भारतीय राजकारणात तो परिणाम घडवू शकेल का, हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे अभिजित दीपके स्वतःही अधिक महत्त्वाकांक्षी झाल्याचे दिसते.
कॉक्रोच जनता पक्षाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे का? या उपक्रमाची सुरुवात एका व्यंगात्मक कल्पनेतून झाली. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर एक अकाउंट सुरू करून त्याची सदस्यता अशा तरुणांसाठी खुली असल्याचे सांगितले, जे बेरोजगार आहेत, सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि सतत टीका-टिप्पणी करण्यात पुढे असतात. त्यांनी पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. त्यात पाच प्रमुख मागण्या होत्या.
१ निवृत्तीनंतर न्यायाधीशांना राज्यसभेत पाठवू नये,
२ एखाद्या पात्र नागरिकाचे मतदानाचे नाव वगळले गेल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांवर कठोर कारवाई करावी,
३ संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण द्यावे,
४ उद्योगपतींच्या मालकीच्या मीडिया संस्थांचे परवाने रद्द करावेत,
५ पक्षांतर करणाऱ्या खासदार-आमदारांना २० वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.
दीपके यांच्या या आवाहनाची घटना घडली १६ मे रोजी. त्याच्या आदल्या दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी म्हणजेच सूर्यकांत यांनी एका वक्तव्यात तरुणांचा उल्लेख ‘कॉक्रोच’ असा केला होता. नंतर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले. मात्र, तोपर्यंत या वक्तव्याविरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. कॉक्रोच जनता पक्षाचे सोशल मीडिया खाते ही त्यापैकीच एक प्रतिक्रिया मानली जाते.
अवघ्या ७२ तासांत या खात्याला इन्स्टाग्रामवर ३० लाख अनुयायी मिळाले. पाच दिवसांत हा आकडा एक कोटींवर पोहोचला. २२ मे रोजी, खाते बंद होण्यापूर्वी, त्याचे दोन कोटी अनुयायी झाले होते. सध्या देखील त्याचे दोन कोटी वीस लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याचे दिसते. एक्सवरही (पूर्वीचे ट्विटर) त्याला दोन लाखांहून अधिक अनुयायी मिळाले. दरम्यान, सरकारने या खात्यांवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केल्याने त्याची चर्चा आणि प्रसिद्धी आणखी वाढली.