

Electric Vehicles in India
esakal
अरविंद रेणापूरकर - arvindrenapurkar@gmail.com
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी वेगाने वाढत असली, तरी चार्जिंग सुविधा, बॅटरीसाठी आयातीवरील अवलंबित्व आणि उच्च प्रारंभिक किंमत ही आव्हाने कायम आहेत. मात्र, इंधनदरवाढ, सरकारी प्रोत्साहन आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून वाढता ग्राहकांचा कल यामुळे ‘हर घर ईव्ही’चे स्वप्न आता वास्तवाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
भारतातील खडतर आणि ओबडधोबड रस्त्यांवर विजेवर चालणारी वाहने सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनतील, अशी कल्पना काही वर्षांपूर्वी अवघड वाटत होती. अनेक ग्रामीण भागांमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्याच कायम असताना भविष्यात तेथे चार्जिंग स्टेशन उभी राहतील, हा विचारही दूरचा वाटत होता. मात्र, गेल्या दोन दशकांत पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) सातत्याने चालना देण्यात आली. आज देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे. ‘हम दो हमारे दो’ किंवा ‘हर घर नल’ यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांप्रमाणेच ‘हर घर ईव्ही’ ही संकल्पना अप्रत्यक्षपणे आकार घेत असल्याचे दिसते. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (फाडा) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशात सुमारे २४.५ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. ही मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांची वाढ आहे. आगामी काळात हा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.