कोरोनामुळे आठवले गाव; सव्वा लाख नागरिकांनी घेतली गावाकडे धाव!

Migration
Migration

पुणे : मूळ गाव पुणे जिल्ह्यातले. पण काम, धंदा, रोजी-रोटी किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेकांनी पुणे-मुंबईसारख्या शहरात कायम वास्तव्य करत, जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीलाच अधिक कवटाळले.

पण कोरोना महामारीने या सर्वांना पुन्हा आपले मूळ गाव आठवले आणि 'गड्या, आपला गाव बरा' म्हणत अनेकांनी आपापल्या मूळ गावची वाट धरली. गेल्या दोनच आठवड्यात पुणे जिल्ह्यातील तब्बल एक लाख २२ हजार ४९८ नागरिक आपापल्या मूळ गावी परतले आहेत. 

यामध्ये सर्वाधिक २४ हजार ५४३ नागरिक हे खेड तालुक्यातील विविध गावे, वाड्या-वस्त्या, तांडे आणि पाड्यांवरील आहेत. सर्वांत कमी म्हणजे केवळ एक हजार ३३५ नागरिक हे हवेली तालुक्यातील परतले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीतून हे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी केवळ दोन आठवड्यांची आहे. लॉकडाउनपूर्वी आलेले आणि पोलिस किंवा महसूल प्रशासनाची परवानगी न घेता, लपून-छपून आलेल्यांचा समावेश नाही, हे विशेष आहे. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाखो नागरिक मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर आदी प्रमुख शहरांसह राज्याच्या विविध भागात नोकरी किंवा काम-धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत. आतापर्यंत हे नागरिक केवळ, दसरा, दिवाळी किंवा यात्रा-जत्रांसाठीच मूळ गावी येत असत. तेही अगदी स्वत:च्याच मूळ गावात चार-आठ दिवसांचे पाहुणे आल्यागत येत असत. पण कोरोनाने आता या सर्वांना सक्तीने मूळ गावी परत आणले आहे. 

आपापल्या मूळ गावी परतलेले तालुकानिहाय नागरिक पुढीलप्रमाणे :-

आंबेगाव - ११६०७, इंदापूर - ५९६९, खेड - २४,५४३, जुन्नर - ११,४८६, दौंड - ६७६२, पुरंदर - २४४६, बारामती -९६०७, भोर - १२,३२३, मावळ - २९५२, मुळशी - ५९८८, वेल्हे - ५७३४, शिरूर - २१,७४६ आणि हवेली - १३३५.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com