बारामती : स्वाभिमान हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे, ज्या वेळेस राष्ट्रहिताचा विषय येतो तेव्हा शिवसेना खंबीर असते, दिल्लीसमोर स्वाभिमान कायम ठेवणारा व कधीही न झुकणारा पक्ष म्हणून शिवसेनेला ओळखले जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
बारामतीत शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. कायम राष्ट्रहिताचाच विचार शिवसेनेने केला आहे. आज देशाच्या ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम सुरु असून हे कधीही सहन केले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी या वेळी बोलताना दिला. शिवसेनेची पवार यांनी या प्रसंगी प्रशंसा केली.
पवार म्हणाले, काही जणांनी शिवसेना फोडण्याची भूमिका घेतली, काही लोक गेले आहेत पण लाखो शिवसैनिक निवडणूकीत त्यांना निश्चितपणे त्यांची जागा दाखवतील. कोरोनाच्या संकटात उध्दव ठाकरे यांनी अठरा तास काम करत राज्याला संकटातून बाहेर तर काढले विकासकामेही सुरुच ठेवली. सत्ताधा-यांकडून सत्तेचा सातत्याने गैरवापरच केला जात असून या प्रवृत्तीविरुध्द आपला लढा असल्याचे ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनीही या प्रसंगी या निवडणूकीत सुरु असलेली लढाई ही स्वाभिमान व संघर्षाची असल्याचे नमूद करत आपण कायम लढतच राहणार हे स्पष्ट केले.शिवसेनेचे नेते सचिन अहीर यांनी विजय शिवतारे यांचा नामोल्लेख टाळत पुरंदरला नवीन वाघ तयार झाला असे वाटत होते मात्र तो वाघ खोक्याच्या की बोक्याच्या मागे गेला हे समजलेच नाही. या मेळाव्यास अँड. राजेंद्र काळे, अविनाश बलकवडे, युगेंद्र पवार, शरदचंद्र सुर्यवंशी, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.