corona1
corona1

दीड वर्षांच्या गांधीगिरीला यश, कर्नलवाडी ग्रामस्थांना अखेर मिळाला न्याय

सोमेश्वरनगर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील गीतांजली ब्रीडर्स या पोल्ट्रीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने त्रस्त झालेले ग्रामस्थ दीड वर्ष आरोग्य हक्कासाठी गांधीमार्गाने लढत होते. प्रशासन, कंपनी मात्र ढिम्म होते. अखेर ग्रामस्थांनी थेट टाळेच ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आमदार संजय जगताप यांनीही समक्ष पाहणी करून उलटी चक्रे फिरविली. अखेर प्रशासन जागे झाले. काल पुरंदर- दौंडच्या प्रांताधिकाऱ्यांनी सदर पोल्ट्रीमुळे प्रदूषण होते, हे अधोरेखित केले. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत पोल्ट्री बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण आदेशही दिला आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्नलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत झिरीपवस्ती येथे गीतांजली ब्रीडर्स या कुक्कुटपालन कंपनीची भलीमोठ्ठी दहा पोल्ट्रीशेड आहेत. कंपनीच्या गैरव्यस्थापनामुळे परिसरात दुर्गंधी व माशांचा प्रादुर्भाव वाढला होता. सव्वा- दीड वर्ष पत्रव्यवहार करून, ग्रामसभेत ठराव घेऊनही प्रशासन ढिम्म होते. अखेर मागील महिनाभर ग्रामस्थांनी आंदोलने सुरू केली. यात तहसीलदार, पोलिस यांनी मध्यस्थी केल्यानंतरही कंपनीने उपाययोजना केल्या नाहीत. कंपनी बड्या सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित असल्याने ग्रामस्थांवर दबाव टाकला जात होता. मुदतीवर मुदत देऊनही कंपनी हलत नव्हती. अखेर सरपंचाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ टाळाच ठोकणार होते. मात्र, आमदार संजय जगताप यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली. आणि त्यानंतर ढिम्म प्रशासनाची चक्रे फिरली.

प्रांताधिकारी यांनी मारुती हरिभाऊ पवार व अन्य आठ जणांच्या तक्रारीनुसार कार्यवाही केली. त्यांना तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांनी अहवालही सादर केले. गीतांजली कंपनी अन्न- पाणी साठवतो आणि त्यातून माशांचा प्रादुर्भाव वाढतो. कोंबडीच्या विष्ठेपासून वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या स्लरीमुळे प्रचंड दुर्गंधी व माशा वाढतात. मेलेल्या कोंबड्यांची व कोंबडीच्या विष्ठेची विल्हेवाट व्यवस्था नाही. इटीपी प्लांट नाही. परिणामी ग्रामस्थांना श्वसनाचे रोग होतात आणि फळबागा व शेतीचे नुकसान होते. जनावरे, वन्यजीव यांनाही बाधा होते, असे सरकारी अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालाचे अवलोकन केल्यावर प्रांताधिकारी यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत सदर पोल्ट्रीशेड बंद ठेवणे उचित वाटले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पोल्ट्रीशेड बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी गुरुवारी बजावले.

ग्रामस्थांच्या गांधीवादी लढ्यानंतर प्रांताधिकारी यांनी योग्य निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिला आहे. प्रदूषण होते, हे विविध सरकारी अहवालांनी नमूद केले आहे, आता परिसर प्रदूषणमुक्त करून पूर्ण न्याय द्यावा, अशी अपेक्षा सरपंच सुधीर निगडे, माजी सरपंच अशोक निगडे व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर आमदार संजय जगताप यांनी, ग्रामस्थांच्या प्रयत्नांना दाद दिली आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com