आता खडकवासला धरणच येतंय अतिक्रमणाच्या विळख्यात; बांधकामांकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Khadakwasla_Dam
Khadakwasla_Dam

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन्ही बाजूंना गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, निगडे, सोनापूर, आंबी, कुडजे, मांडवी बु., मांडवी खु., आगळंबे, जांबली आणि इतर गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचे पेव फुटलेले दिसत आहे. राजरोसपणे भराव टाकून सुरू असलेल्या या बांधकामांकडे पाटबंधारे विभाग मात्र दुर्लक्ष करताना  दिसत आहे.

खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूला याअगोदरही पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून मोठे रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊस व इतर बांधकामे करण्यात आलेली आहेत.जानेवारी 2020 मध्ये रेश्मा संतोष बराटे (मांडवी खुर्द), विनायक पुंडलिक काळभोर (कुडजे), संजय मनोहर जाधव(निगडे), काशिराम राजाराम नातू (आगळंबे),गायत्रीदेवी गणपत पटवर्धन (कुडजे), हॉटेल ॲक्वॅरिअस ॲंड रिसॉर्ट (गोऱ्हे बु.), अनिल काशिनाथ चिंचणकर (कुडजे), रमेश मयुरदास ठक्कर (कुडजे), आदित्य महाराज सिंग(कुडजे), श्रीकांत विष्णु देशपांडे (ओसाडे),ताराप्रकाश प्रभाकर वर्तक(आगळंबे), अशोक रामभाऊ लोहकरे (ओसाडे), जयवंत राजाभाऊ म्हाळगी(खानापूर), रमेश भालचंद्र गरवारे (गोऱ्हे बु.), हेमंत नागेश भट(गोऱ्हे बु.), श्रीधर शामराव कलमाडी (गोऱ्हे बु.),पायल आदित्य भारतीय व मंगेश शामराव कलमाडी (गोऱ्हे बु.), सुधीर शंकर साबळे (गोऱ्हे बु.) दिलीप सुमनवार (मांडवी बु.) यांसह इतर काही नागरिकांना बाटबंधारे विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे सध्याही अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अनेक मोठे राजकारणी आणि व्यावसायिकांची अतिक्रमणे
धरणाच्या पाणलोट क्षेत्राला लागून अनेक मोठे राजकीय पुढारी, उद्योगपती, व्यावसायिक यांनी जागा खरेदी केलेल्या आहेत. या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकामे केलेले आहेत. राजकीय किंवा इतर दबावामुळे पाटबंधारे विभाग कारवाई करत नाही का? असा प्रश्न सर्वमान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणलोट क्षेत्र कमी होऊन प्रदुषणात वाढ
शेकडो एकर जागेवर भराव घालून होत असलेल्या अतिक्रमणांमुळे खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र तर कमी होत आहेच शिवाय सांडपाण्यामुळे जलप्रदूषणही वाढताना दिसत आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर होण्याच्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"खानापूर गावच्या हद्दीतील 80% पेक्षा जास्त अतिक्रमणे काढले आहेत.इतर गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत.पाटबंधारे विभागाचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत.धनदांडगे लोक धरणाच्या कडेने जागा खरेदी करून राजरोसपणे धरणाच्या पाण्यात भराव टाकत आहेत."
- निलेश जावळकर, माजी सरपंच, खानापूर.

"सध्या पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे.या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात येणार आहे.मोठ्या मशिनरी लावून पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. तसेच संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे." - पोपटराव शेलार, स्वारगेट उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com