राजा किंचाळला, आरडाओरडा झाला अन् अंधारात...

leopard1.jpg
leopard1.jpg

टाकळी हाजी (पुणे) : रात्री साडेदहाची वेळ अन्‌ घोडा मोठ्याने किंचाळल्याचा आवाज आला. बिबट्या घोड्याच्या मानेवर धरून ओढून नेत होता. आम्ही ओरडलो तसे बिबट्याने मृत घोड्याला सोडले. मात्र, अंधारात बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. अखेर वनविभागाने पिंजरा आणला त्यात बिबट्या अडकला. पण घाटाचा राजा म्हणून ओळखला जाणारा घोडा गमावून बसलो. अशी भावनिक हळहळ कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी महेंद्र दगडू सांडभोर यांनी व्यक्त केली. 

बैलगाडा शर्यतीला बंदी असली तरी देखील बैलगाडा घाट अन सर्जा राजा सारख्या बैलांबरोबर पळणारा घोडा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शिरूर, आंबेगाव, राजगुरुनगर, जुन्नर तालुक्‍यात घरासमोर बैलाची जोडी अन घोडा पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. घाटाचा मान सांभाळण्यासाठी लाखो रुपयांचे हे पाळीव प्राणी आजही मुलांप्रमाणे सांभाळले जातात. यांत्रिकीकरण झाले. त्यामुळे शेतीला या पाळीव प्राण्यांची गरज कमी होत गेली. पण शेतकरी वर्ग आजही मानासाठी व बैल पोळ्याच्या सणासाठी हे पाळीव प्राणी संभाळतो. 

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी महेंद्र सांडभोर यांचे वडील दगडू सांडभोर यांनी देखील बैलगाडा शर्यतीत मानाच स्थान मिळवलेले आहे. बैलगाडा घाटात त्यांची बैलगाड्याची बारी नेहमी नंबरात येत होती. घोडा शर्यतीत हा घोडा नेहमी नंबर मिळवायचा. बैलगाडा शर्यतीवर बंदी आली तरी देखील त्यांनी त्यांच्या गोठ्यात हे प्राणी जिवापाड जपले आहेत. 

सोमवारी (ता. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने गोठ्यामध्ये असणाऱ्या शर्यतीच्या घोड्यावर हल्ला केला. घोड्याला ठार करून ओढत नेत असताना सांडभोर कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडा ओरडा केल्यावर बिबट्याने घोड्याला सोडले. मात्र अंधारात बिबट्याच्या गुरगुरण्याचा भयानक आवाज येत होता. त्यावेळी वनविभागाला या बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळी वनमजूर हनुमंत कारकूड यांनी या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावला. मृत घोड्याचे भक्ष ठेवून बिबट्या जेरबंद करण्यात आला. पुर्णवाढ झालेला बिबट असून त्याला रात्री दोन वाजता माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्राकडे नेण्यात आले असल्याचे वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

तत्काळ बिबट जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा. वनविभागाने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष राजेश सांडभोर यांनी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com