'आंदोलक शेतकरी काय पाकिस्तान-चीनमधून आले आहेत का?' उपमुख्यमंत्री अजित पवार मोदी सरकारवर बरसले

Ajit_Pawar
Ajit_Pawar

वारजे माळवाडी (पुणे) : 'केंद्र सरकारला हे शोभते का? शेतकरी हे काय पाकिस्तान, बांग्लादेश, चीनमधून आले आहेत का? शेतकरी अहिंसेच्या मार्गाने दोन महिन्यांपासून आंदोलन करत असताना रस्त्यावर उलटे खिळे मारले जातात, याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. वडगाव बुद्रुक येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन महिन्यांपासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत होते, त्यावेळी का मत व्यक्त केले नाही, असा खडा सवालही उपमुख्यमंत्री पवार यांनी सेलिब्रिटींना केला. 

'भारतातील शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे बाहेरच्या एका सेलिब्रिटीला वाटले. ते त्यांचे मत असून, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्यानंतर, इथे कोणाकोणाला आता जाग यायला लागली आहे. शेतकरी थंडी वाऱ्यात बसलाय, काहींचे मृत्यू झाले, हे त्यांना दिसले नाही का?' अशी विचारणाही त्यांनी केली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यास निघालेल्या राज्यातील खासदारांना अडविले. त्याबद्दल पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

वीज बिलावरून भाजपकडून आंदोलन करून गैरसमज निर्माण केले जात आहे. बिलावरील व्याज आणि दंड माफ केलेला आहे. 50 टक्के वीज बिल माफ केलेले आहे. यासाठी निधी देखील बाजूला काढलेला आहे. तरी देखील भाजप आंदोलन करीत आहे. आमची लोक देखील पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करीत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी तरी हे भाजप करीत नसेल ना ही शंका निर्माण होऊ शकते. 

'एल्गार परिषदेत एकाने जे विधान केले. ते अजिबात योग्य नाही,' असे पवार म्हणाले, त्या संदर्भात आता गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांच काम करतील. घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे जर चुकीचे काही बोलले असतील. तर त्याच्यावर कारवाई होईल, पण भाषण करणार्‍यांनी तारतम्य ठेवून भाषण करावे. तिथे अनेक मोठमोठी लोक होती. त्या व्यासपीठावर न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती होती. त्यावेळी ते भाषण करीत असताना थांबवायला पाहिजे होतं. आपल्या देशात अनेक समाजातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यामुळे लोकांमध्ये तेढ, द्वेष निर्माण होईल, अशी वक्तव्यं टाळायला हवीत.

निलेश राणेंना टोला
निलेश राणे यांनी पुन्हा टीका केल्याबाबत अजित पवार म्हणाले की, अरे जाऊ द्या, कावळयाच्या शापनं गुरं कधी मरत नसतात. हे सर्वांना माहिती आहे आणि त्यांना सारखं काय महत्व द्यायचं?

त्या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी धनंजय मुंडेंच्या मुलांचे जबाब घेतलेले आहेत. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com