Exclusive: कोरोनामुळे पालकांचे स्थलांतर अन्‌ विद्यार्थी शाळाबाह्य; अॅडमिशनचा टक्का घसरला!

School_Students
School_Students

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात अनेक छोट्या-मोठ्या व्यवसाय बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगाराच्या संधी हातातून गेल्या. परिणामी हजारो कुटूंबियांनी गावचा रस्ता गाठला. कोरोना काळात मोठ्या संख्येने झालेल्या स्थलांतर असो वा त्यामुळे कोलमडलेले अर्थकारण असो याचे पडसाद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर उमटल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांश शाळांमध्ये दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या 30-40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या कित्येक वर्षानंतर अशा प्रकारे मोठ्या संख्येने स्थलांतर कोरोनाच्या संकट काळात झाल्याचे तज्ज्ञ, अभ्यासकांनी अधोरेखित केले आहे. परंतु या काळात झालेले स्थलांतर असो वा कोरोनामुळे उद्‌भवलेल्या आर्थिक, सामाजिक परिस्थिती याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशावर उमटल्याचे दिसून येत आहे. अर्थात यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत फरक पडल्याचे पुण्यातील नामांकित शाळा हे प्रत्यक्षपणे मान्य करत नसल्या तरी काही शाळांनी हे उघडपणे कबूल केले आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता, शाळेतील पटसंख्या अद्याप संकलित केली नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

49 शाळांपैकी जवळपास निम्म्या शाळांमधील प्रवेशात झाली घट
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या थिंकशार्प फाउंडेशनने "स्टडी मॉल' उपक्रमातंर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. दरवर्षी शाळेत होणाऱ्या प्रवेशाच्या संख्येत यंदा लक्षणीयरित्या घट झाल्याचे निरीक्षण यात नोंदविले गेले. सर्वेक्षणादरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात 49 शाळांमधील प्रवेशाची माहिती घेण्यात आली. यामध्ये तब्बल 45 टक्के शाळांमध्ये प्रवेशाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर चार टक्के शाळांमध्ये मागील वर्षी इतकेच प्रवेश झाल्याचे उघड झाले. यामध्ये पुणे जिल्ह्यासह बीड, औरंगाबाद, जालना, पालघर, रायगड, कोल्हापूर, बुलडाणा येथील शाळांचा समावेश असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष फड यांनी दिली.

"इयत्ता पहिली आणि पाचवीसाठी प्रत्येकी तीन तुकड्या आहेत. प्रत्येक इयत्तेत जवळपास 180 प्रवेश क्षमता आहे. या वर्षीचा डिसेंबर महिना सुरू झाला, तरीही अद्याप शाळेमधील 30 ते 40 टक्के जागा रिक्त आहेत. विशेषत: इयत्ता चौथीतून पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे प्रवेशाबाबत सातत्याने पाठपुरावा घेतला जात आहे. परंतु "आम्ही सध्या गावी आहोत, पुण्यात आलो की पाहू', असे पालक सांगत आहे. दरम्यान अन्य शाळेत प्रवेश घेतला का असे पालकांना विचारले असता, "अजून नाही, आम्ही गावाला थांबणार आहोत की शहरात पुन्हा येणार हे अजून ठरविलेले नाही. त्यामुळे अद्याप मुलांचा शाळेत प्रवेश घेतलेला नाही' असे पालक सांगत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्‍यता निर्माण होत आहे.''
- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

शाळा प्रवेशाबाबत थिंक शार्प फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी :
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येचे निरीक्षण 
- विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली घट : 45 टक्के
- मागील वर्षी इतकेच झाले प्रवेश : 4 टक्के 
- यंदा प्रवेशात झाली वाढ : 51 टक्के

50 टक्के जागा अद्याप रिक्त
"प्रशालेत इयत्ता पहिलीसाठी जवळपास 160 प्रवेश क्षमता आहे. प्रशालेतील बालवाडीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्याने पाठपुरावा करून प्रवेश पुर्ण केले आहेत. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया जुनच्या सुरवातीलाच पुर्ण झालेली असते. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यातही 50 टक्के रिक्त आहेत.''
- सुधीर शिंगटे, मुख्याध्यापक, गेनबा सोपनराव मोझे प्रशाला (प्राथमिक)

शाळा प्रवेश कमी होण्याची कारणे :-
- पालकांचे झालेले स्थलांतर
- पालकांना शैक्षणिक खर्चाची सतावणारी चिंता
- नोकरी, रोजगाराबाबतची अनिश्‍चिता असल्याने पालक संभ्रमात

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com