
पुणे : स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पुण्याचे मानांकन घसरून २८ वर पोचल्याबद्दल विविध स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी महापालिका प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टिकेची झोड उठविली आहे. सुरवातीला देशात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पुणे स्मार्ट सिटीचा कारभार का खालावला आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
देशातील १०० शहरांच्या स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पुणे २८ व्या क्रमांकावर पोचले आहे. पहिल्यावर्षी पुण्याचा दुसरा, नंतर टॉप १० मध्ये, तर नंतर टॉप २० मध्ये पुणे होते. आता मात्र हे मानांकन आणखी खालावले असल्याचे उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ''भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रँकिंग घसरले आहे. त्याला महापालिकेतील भाजपचा कारभार कारणीभूत आहे. पुणे शहर हे मुळातच स्मार्ट आहे. गेल्या १५-२० वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली होती. त्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा १४ प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेत राष्ट्रवादीच्या कारभारामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रीट, ई-बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरवात झाली होती. आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्वासघात न करता त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी.''
कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ''शहराला पहिल्या ३ वर्षांत मिळालेल्या ६०० कोटी रुपयांचा निधी वेळेत खर्च केला नाही, त्यामुळेच पुण्याला पुढचा निधी मिळू शकला नाही, ही शहरासाठी लाजीरवाणी बाब आहे. भाजपने स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविल्यामुळे पुणेकरांनी १०० नगरसेवक निवडून दिले आणि भाजपला एक हाती सत्ता दिली. परंतु, भाजपनेच स्मार्ट सिटीचा बोजवारा उडविला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी हा भाग विकसित झाल्यावर संपूर्ण पुण्याचा विकास होईल, अशी ग्वाही भाजपने दिली होती. परंतु, त्याच भागातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या दोन वर्षांत महापालिकेने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. त्यामुळे पुणेकरांचा अपेक्षाभंग झाला आहे.''
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, ''मुळातच या योजनेत औंध, बाणेर, बालेवाडी हाच भाग स्मार्ट होणार होता. २०१६ ते १९ या पाच वर्षांत ३ हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते. तर संपूर्ण शहरात ९०० कोटी रुपये खर्च करून पीएमपीएमएल सक्षम करणे, चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना, स्मार्ट मिटरींग आणि शून्य पाणी गळती, सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया ही उद्दिष्ट होती. याबाबत काय झाले आहे, याचे पुणेकर साक्षीदार आहेत. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांनंतर पुण्याचा २८ वा क्रमांक तरी कसा आला हेच कोड आहे. पुण्यापेक्षा खाली नंबर लागलेल्या उर्वरित ७२ शहरांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी.''
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.