पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशासाठी २५ टक्के राखीव जागांवर पुण्यामध्ये बोगस अर्ज करून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी लॉटरी काढली असली, तरी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ही प्रक्रिया ठप्प होती. राज्यातील फक्त पुणे जिल्ह्यातच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याची शिक्षण विभागाने आता चौकशी सुरू केली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सर्व खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ४८४ प्रवेश क्षमता असून यासाठी २ लाख २२ हजार ५८४ जणांनी अर्ज केले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने ७ एप्रिल रोजी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज गेले आहे. मात्र, पुण्यातील पालकांना अद्याप मेसेज आलेले नसल्याने पालकांनी याबाबत चौकशी सुरू केली असता हा प्रकार समोर आला आहे.
‘आरटीई’साठी अर्ज भरताना पालक अनेकदा दोन अर्ज भरतात. पण पडताळणीमध्ये त्यातील एक अर्ज रद्द होतो. यंदा पालकांनी दुसरा अर्ज न भरताही त्याच नावाने दुसरा अर्ज भरला गेला. तसेच काही पालकांना तुमचा अर्ज डिलीट झाल्याचा मेसेज आल्याने, त्यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. याबाबत पडताळणी केली असता असे ५७२ डुप्लिकेट अर्ज शिक्षण विभागाला आढळले आहेत. पुण्यात प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असल्याने ५७२ अर्जांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने अद्याप लॉटरीमध्ये पात्र झालेल्या पालकांना मेसेज गेलेले नव्हते. शुक्रवारी सायंकाळी ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
आरटीई प्रवेश पुणे जिल्हा
एकूण शाळा - ९८५
प्रवेश क्षमता - १४७७३
आलेले अर्ज - ५५८१३
बोगस अर्ज - ५७२
पुणे शहर, हवेली आणि पुरंदर तालुक्यांत बनावट अर्ज भरले गेले. हा प्रकार कसा झाला याची तपासणी सुरू आहे. एकाच नावाने अर्ज भरून प्रवेशाची संधी वाढविण्याचा प्रकार असू शकतो. पण यात पालकांचे व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- सुनील कुऱ्हाडे, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), पुणे
राज्यात फक्त पुणे जिल्ह्यात अशा प्रकारे बनावट अर्ज भरले गेले आहेत, त्यामुळे याची चौकशी होऊन अर्ज करणाऱ्यांचा हेतू समोर आला पाहिजे. तसेच, पुणे जिल्ह्यातील प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करावी.
- मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष, आप
‘आरटीई’च्या अंतर्गत पाल्यांचा अर्ज भरला आहे, लॉटरीही काढण्यात आली आहे. आधीच प्रवेश प्रक्रियेस उशिर झालेला असताना त्यात आणखी विलंब करणे योग्य नाही.
- शिवाजी चव्हाण, पालक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.