पुणे - वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये आर्थिक आणि सामरिक अस्थिरता अधिक वाढत आहे. देशाच्या सामरिक निर्भयतेसाठी खऱ्या अर्थाने भारतीय असलेली आत्मनिर्भरता आवश्यक आहे, असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या "द इंडिया वे' या पुस्तकासंबंधी माजी राजदुत गौतम बंबावाले यांनी डॉ.जयशंकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी)आयोजित या ऑनलाइन कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. विजय केळकर, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार आणि भारतीय दृष्टीकोणाविषयीची मांडणी डॉ. जयशंकर यांनी यावेळी केली. देशाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती इतर देशांपेक्षा भिन्न आहे.
तसेच धोरणात्मक आणि सामरिक परराष्ट्र व्यवहारांची इथली परंपरा आणि संस्कृतीचे स्वतःचे वेगळेपण असून, तेच खरे बलस्थाने असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. ते म्हणाले, 'प्रत्येक देशाची आर्थिक आणि सामरिक व्यवहार दर पाच वर्षांनी बदलत आहे. त्यामुळे सध्या जगामध्ये बहुविध आर्थिक आणि सत्ताकेंद्रे तयार होत आहे. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थांमध्ये पारदर्शक समतोल तयार होत आहे. त्यामुळे परराष्ट्र व्यवहार आणि सामरिक रणनीती अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे.'' चीनच्या विस्तारवादाला रोखायचे असेल, तर संरक्षणाबरोबरच देशातील लघु आणि मध्यम उद्योगांतून येणारी आत्मनिर्भरताही महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ.जयशंकर म्हणाले.
डॉ. जयशंकर म्हणाले....
1) सुधारणांचा पुनर्विचार हवा -
मागील 20-15 वर्षांतील सुधारणांचा पुनर्विचार करायला हवा. आजवरच्या सुधारणांतून सामान्य माणसाचे जीवन खरंच सुसह्य झाले का? त्याच्या रोजच्या गरजा पुर्ण होतात का? यांचा विचार करायला हवा. वाढत्या लोकसंख्येबरोबरच रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करण्यासाठी नव उद्योजकता आणि कल्पकतेला वाव मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि मानव विकासाच्या सुधारणा व्हायला हव्यात, तरच चीन सारख्या विस्तारवादाला आपण पायबंद घालू शकतो.
2) चीनचे आव्हान भिन्न -
जागतिक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग चीनने व्यापला आहे. उत्पादन, सेवा आदी आर्थिक आघाडीवर त्याने चांगला जम बसवला आहे. निश्चितच आपणही याकडे लक्ष द्यायला हवे. पण, आपण म्हणजे चीन नव्हे. कारण दोन्ही देशातील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय स्थिती वेगवेगळी आहे. आपल्याला लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्याबरोबरच नवसंशोधनाला उदयोन्मुख करावे लागेल. त्या आधारे झालेला शाश्वत विकास आर्थिक आघाडीवर चीनची बरोबरी करेल. भविष्यात निश्चितच चीनसोबतचा सीमा विवाद आपल्याला मिटवावा लागेल. दोन्ही देशांमध्ये पारदर्शक आणि सुदृढ नाते विकसित करावे लागेल.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.