आता तरी आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या; जिल्ह्यातील शिक्षकांची मागणी

Teaching
Teaching

पुणे - गुरुजी म्हटलं की, विद्यार्थ्यांना शिकवण, हे आमचं मूळ काम. शिक्षणात गुरू असलो तरी आम्ही आरोग्याच्या बाबतीत अप्रशिक्षितच आहोत. पण गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षणाचे काम सोडून, आमच्याकडून कोरोनाचे काम करून घेण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटून गेले आहेत. तरीही आता पुन्हा एकदा शिक्षकांकडे जिल्ह्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या मोहिमेतील सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतच्या अध्यादेशात शिक्षकांकडे हे काम सोपविण्याचा साधा उल्लेखही नाही. मग किमान आता तरी, आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ना, अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आणि पुरंदर तालुका महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला अन्‌ शिक्षकांच्या कामाचं स्वरूपच बदलून गेलं. विद्यार्थ्यांना शिकवायचं, हे शिक्षकांचं मूळ काम. पण कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेचं कारण पुढे करत, मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांना त्यांचे मूळ कामंच करू दिलं जात नसल्याचे शिक्षक संघाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गणेश लवांडे, कार्याध्यक्ष विजय वाघमारे आणि सरचिटणीस सचिन बोरावके यांनी सांगितले. या मागणीबाबतचे लेखी निवदेन आमदार पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुळात आरोग्याच्या बाबतीत शिक्षक अप्रशिक्षित. त्यातही त्यांना कोरोनापासून संरक्षणासाठी आवश्‍यक साधनेही उपलब्ध करून दिलेली नाहीत. ना मास्क, ना सॅनिटायजर, पीपीई किटचे नाव घ्यायचे नाही. शिक्षकही माणूसच आहे. त्यांनाही जीव आहे. कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, याचाही सर्वांनाच विसर पडला असल्याची खंतही लवांडे आणि वाघमारे यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून शिक्षक सातत्याने कोरोना सर्वेक्षणाचे काम करत आहेत. त्यातही 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ देता यावा, या उद्देशाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची कोरोनाच्या कामातून मुक्तता करण्याबाबतची घोषणा केली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यात या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाबाबतचे काम चालूच ठेवले आहे.

त्यातच आता राज्य सरकारने 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझे जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कोरोनामुक्त राज्य करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात याही सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी शिक्षकांकडे ग्रामीण भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण, स्वस्त धान्य दुकानातून वाटप केल्या जाणाऱ्या अन्नधान्य वितरणाची देखरेख व नियंत्रण करणे, कोविड केअर सेंटरवरील रुग्णांचा डेटा तयार करणे आणि तपासणी नाक्‍यावर तपासणी करण्यासाठीची कामे शिक्षकांकडे सोपविण्यात आली होती. उन्हाळी सुट्टीत शिक्षकांनी ईमाने-इतबारे ही कामे केली आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com