ढिंग टांग : ‘विस्तार’भयास्तव...!

प्रिय मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. नानासाहेब फडणवीस यांसी शि. सा. न. सदरील पत्र मी आमच्या सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात बसून लिहीत आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal

प्रिय मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. नानासाहेब फडणवीस यांसी शि. सा. न. सदरील पत्र मी आमच्या सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात बसून लिहीत आहे. किंबहुना तेच माझ्याकडून हे पत्र लिहवून घेत आहेत! मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार? अशी विचारणा करण्यासाठी त्यांनी मला घेराव घातला आहे. तारीख दिल्याशिवाय येथून उठू देणार नाही, असे ते म्हणतात. काय करु? कृपया मार्गदर्शन करावे.

अकरा महिन्यांपूर्वी आपण दोघांनी ‘चंमत-ग’ करुन नवे सरकार आणले. नवे सरकार आणण्याचा आनंद थोडाच होता, मातोश्रीवाल्यांना धडा शिकवल्याचा आनंद जास्त होता, हे कबूल करावे लागेल. प्रारंभी आपण दोघांनीच शपथा घेतल्या. मग सावकाश अठरा जणांचे मंत्रिमंडळ आले. त्यानंतर मात्र विस्तार झालेला नाही...

आपले सरकार हे गतिमान सरकार आहे. हे लोकांच्या मनातले सरकार आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. लाल फितीचा कारभार संपुष्टात आणणारे हे घटनेला धरुन जन्माला आलेले सरकार आहे... हे सारे आपण गेले अकरा महिने बोलत आहोत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या महिन्याला दोन याप्रमाणे बावीसवेळा प्रसिद्ध झाल्या. आमचे सहकारी किमान बावीस वेळा तरी माझ्याकडे येऊन विचारणा करुन गेले. दरवेळी काही ना काही कारण (पक्षी : आश्वासन) देऊन वेळ मारुन नेली, पण आता परिस्थिती कठीण होत चालली आहे. काय करु?कृ. मा. क.

आमचे मित्र मा. बच्चूभाई कडू समोर येऊन हाताची घडी घालून शांतपणे उभे राहतात. एक शब्द बोलत नाहीत, तरीही मला टेन्शन येते! शहाजीबापूंनाही ‘सगळं ओके?’ अशी खुशाली विचारायचीही सोय राहिलेली नाही. मंत्रिपद शक्य नसेल तर एखादे महामंडळ तरी द्या, असे काही लोक सांगून गेले आहेत. काय करावे? समजत नाही. कृ. मा. क. आपला नम्र. कर्मवीर (मु. पो. ठाणे)

प्रिय सन्मित्र कर्मवीर, अनेक उत्तम आशीर्वाद! मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आपण दोघांनी कमी का प्रयत्न केले? कित्येकदा जोडीने दिल्लीला जाऊन आलो. अनेकदा विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा करायची आहे, असे सांगून दिल्लीला जाऊन एक दिवस राहून परत आलो!!

मंत्रिमंडळ विस्तार याविषयी तुम्हाला थोडे ज्ञान देण्याची गरज आहे, असे मला वाटते. मंत्रिमंडळ विस्तार ही एक आभासी गोष्ट आहे, हे आधी लक्षात घ्या. सत्तेच्या राजकारणातला हा बेसिक धडा आहे. मंत्रिमंडळ विस्तार हे बव्हंशी एक आश्वासन असते. ती प्रत्यक्षात करायची गोष्ट नाही. हा न फेडायचा नवस आहे! मंत्रिमंडळ विस्तार हे आपल्याजवळचे गुप्त अस्त्र असते. त्याचा उपयोग कधी करायचा नसतो. केवळ विस्ताराच्या गप्पा करुन आपण अकरा महिने काढले, अजून अकरा महिने काढायला काय प्रॉब्लेम आहे? हेही दिवस जातील!!

तुमचे बच्चूभाई माझ्याकडेही (हाताची घडी घालून) येऊन गेले! त्यांनी भिवई उडवली. मीदेखील उडवली, आणि त्यांचा हात गपचूप दाबला! तेवढे आश्वासनही आपल्या सहकाऱ्यांना पुरते!! (आमच्या पक्षातही वेगळे वातावरण नाही. आमच्यातल्या काही लोकांनी तर थेट दिल्लीला फिल्डिंग लावली आहे.) तुम्हीही तसेच करत जा! केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार करायचा असल्याने त्यानंतर राज्यात विस्तार होईल, अशी नवी माहिती त्यांना द्या. त्यांचे समाधान होईल!!

मंत्रिमंडळ विस्तार कधी? असे कुणी विचारल्यास ‘योग्यवेळी’ असे एका शब्दात उत्तर द्यायचे, आणि पुढे जायचे, हे लक्षात ठेवा! बाकी सारे काही उत्तम चालले आहे. विस्तारभयास्तव जास्त लिहीत नाही. पुन्हा भेटूच. केवळ तुमचा. नानासाहेब फ. (उ. मा. मु.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com