९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) वर्धा येथे होणार असल्याचे निश्चित झालं आहे. विदर्भ साहित्य संघाचे शताब्दीवर्ष सध्या सुरु आहे. त्यामुळे वर्धा येथे साहित्य संमेलन घेण्यासाठी विदर्भातील साहित्यिक उत्सुक होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी जानेवारी-फेब्रुवारीत साहित्य संमेलन होऊ शकतं, असं सुतोवाच केलं आहे. त्यामुळे आता आगामी संमेलनाध्यक्ष कोण असावे, यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे. अलीमुल्लाखान कलीमुल्लाखान वकील अर्थात डॉ. अलीम वकील हे नाव सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं अतिशय योग्य ठरेल. वर्धा येथे संमेलन होत असल्यानं संमेलनाध्यक्ष गांधीवादी विचारसरणीचे असावे, असा चर्चेचा सूर असताना डॉ. अलीम वकील या गांधीवादी साहित्यिकाला आगामी संमेलनाध्यक्षपदी संधी मिळायला हवी. (Sahyadricha Matha by Dr Rahul ranalkar Saptarang Marathi Article Nashik News)
पुण्यामध्ये १९९० मध्ये झालेल्या ६३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक यू. म. पठाण यांनी भूषविलं होतं. त्यानंतर धर्मानं मुस्लिम असलेल्या मराठी साहित्य अभ्यासकाला अशी संधी मिळाली नाही. वर्धा येथे हा योग साधता येणं शक्य आहे. डॉ. वकील हे तसं प्रसिद्धीपासून कोसो मैल दूर असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. गांधीवादी विचारांबरोबरच धर्मनिरपेक्ष आणि सर्वोदयी विचारसरणीतून त्यांनी अव्याहत लेखन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका त्यांनी विविध व्यासपीठांवर वेळोवेळी मांडली आहे. वर्ध्याला गांधी-विनोबा सहवासाची पार्श्वभूमी आहे. वर्धा येथे होऊ घातलेलं साहित्य संमेलन तब्बल ५६ वर्षांनी होत आहे. १९६७ मध्ये वर्धा येथे ४८ वे साहित्य संमेलन झालं होतं. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण प्रसारक मंडळ आगामी संमेलनाचं आयोजन करत आहे.
वर्धा येथे संमेलन होत असल्यानं गांधीवादी विचारांचे अनुयायी असलेल्या डॉ. अभय बंग यांचं नाव पुढे येणं स्वाभाविक आहे. डॉ. बंग हे ख्यातनाम कृतीशील विचारवंत आहेत. पण संमेलनाध्यक्ष भूमिका घेऊन सतत लिहिता असावा, असा एक अलिखित नियम आहे. त्यादृष्टीने डॉ. अलीम वकील हे नाव अधिक योग्य ठरेल. महात्मा गांधी, विनोबा भावे, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या विचारांवर डॉ. वकील सतत लिहित, बोलत आणि चिंतन करत आलेले आहेत. लिखाणातून या दिग्गजांच्या विचारधारेवर त्यांनी सतत प्रकाशझोत टाकला आहे. डॉ. अलीम वकील पुरोगामी विचारांचे असले तरी देखील ते कोणत्याही गटा-तटात नाहीत, हे विशेष. तटस्थपणे सध्याच्या परिस्थितीवर ते रोखठोक भूमिका ते घेत आलेले आहेत.
डॉ. अलीम वकील सध्या भगवदगीता आणि कुराण यांच्यातील कर्मयोगावर पुस्तक लिहित आहेत. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी पुढच्या काही महिन्यांत प्रकाशित होईल. महात्मा गांधी यांच्यावरील वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत या संशोधनत्माक पुस्तकावरही त्यांचं काम सुरु आहे. तत्पुूर्वी महात्मा आणि बोधीसत्त्व हे त्यांचं पुस्तक १९९१ मध्ये चांगलंच गाजलं होतं. केवळ धर्मानं मुसलमान असल्यानं तेव्हा ते या वादातून सहीसलामत सुटले, हे देखील आणखी एक विशेष. या पुस्तकाच्या मराठीत १६ तर इंग्रजीत चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. देश-विदेशातील मोठ्या ग्रंथालयांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.
डॉ. वकील यांनी अमळनेरच्या प्रताप महाविद्यालय, संगमनेर महाविद्यालय, पुणे विद्यापीठातील लोकप्रशासन विभाग, जळगावचे थिम महाविद्यालयात शिक्षण दानाचे कार्य केले. निवृत्तीनंतर के. के. वाघ कला, वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भूषविले. चोपडा येथे जन्मलेले डॉ. वकील यांचं बालपण एरंडोल येथे गेलं. सध्या ते चांदवड येथे स्थायिक आहेत. १५ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. तर ७ विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आलं आहे. सध्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर परखड भाष्य करणारे संयत, संयमी लेखक म्हणून यंदा त्यांना संमेलनाध्यक्षाचा मान मिळाल्यास मराठी भाषेची पताका अन्य धर्मीय समूहांमध्ये देखील गौरवाने फडकेल, यात शंका नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.