वीरपत्नीचा लढा आणि व्रत !

सातारा बसस्थानकाच्या समोर मी मुंबईच्या एका मित्राचं पार्सल देण्यासाठी थांबलो होतो. तिथून मला पुढं सविता पाटीलच्या गावी वडूजला जायचं होतं.
satara bus stand husband wife struggle life
satara bus stand husband wife struggle lifeSakal

सातारा बसस्थानकाच्या समोर मी मुंबईच्या एका मित्राचं पार्सल देण्यासाठी थांबलो होतो. तिथून मला पुढं सविता पाटीलच्या गावी वडूजला जायचं होतं. ज्यांना पार्सल द्यायचं होतं, त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, मी आपली वाट पाहून निघालो, ते पार्सल बसस्थानकात एक महिला वाट बघत बसली आहे, त्यांना द्या.

त्या मला पार्सल देतील. त्यांनी सांगितलेल्या जागी मी त्या महिलेला पार्सल देण्यासाठी गेलो. मी त्या महिलेला पार्सल दिलं. कपाळावर कुंकू नाही. बाजूला दोन लहान लहान मुलं बसलेली. एक काळा चष्मा लावलेला म्हातारा माणूस. दोन्ही हातात दोन बॅग असं चित्र समोर होतं. मी हातामध्ये पार्सल ठेवल्यावर त्यांना विचारलं, ताई, तुम्ही कुठल्या भागात जाणार आहात.

त्या महिलेनं मला जिथं जायचं तिथलं नाव सांगितलं. मी म्हटलं, मीही त्या भागातून चाललोय, तुम्हाला तिकडं सोडलं तर चालेल का ? त्या महिलेनं एक मिनिट म्हणत, कुणाला तरी फोन लावला. तिचा फोन झाल्यावर ती माझ्याकडं पाहत म्हणाली, हो दादा चला. आम्ही गाडीत बसलो. मोठ्या मुलानं लगेच जय हिंद म्हणत मला नमस्कार केला. मी दोनतीन वेळा निरीक्षण केलं. तो मुलगा जय हिंद, जय हिंद म्हणत होता.

मी त्या महिलेला विचारलं, की हा मला अभिवादन करताना किंवा आदर दाखवताना जय हिंद का म्हणतोय. ती महिला म्हणाली, त्याच्या वडिलांचे संस्कार आहेत. त्याचे वडील सैनिक होते. दोन वर्षांपूर्वी ते हुतात्मा झाले. पोराला थोडाबहुत वडिलांचा सहवास मिळाला. त्यातून त्यानं वडिलांचे गुण घेतले आहेत. ती महिला कोण आहे? ती कुठून आली? तिच्या घरी कोण आहे? तिची एकूण परिस्थिती कशी, तिचा सैनिकी नवरा आणि लग्न झाल्यापासून सगळं मी विचारल्यावर ती सांगत होती.

साताऱ्यापासून अगदी जवळ त्या महिलेचं गाव. ती महिला, तिचे सासरे, या सगळ्यांशी बोलताना आणि त्यांच्याकडून ते सगळं ऐकताना मलाही खूप त्रास होत होता. मी ज्या महिलेशी बोलत होतो, तिचं नाव मालती. तिच्या पतीचं नाव कान्हा श्रीपतराव शिंदे. मालती मूळ कोल्हापूरची. लग्न करून ती कान्हाच्या घरी आली.

लग्नाच्या तीन वर्षांपूर्वी कान्हा सैनिक म्हणून भरती झाले होते. जम्मू- कश्मीरमध्ये घातपाताच्या एका घटनेत तेरा जवान हुतात्मा झाले होते. त्यामध्ये कान्हालाही वीर मरण आले. मालती सोबत असणारा तो काळा चष्मा घातलेला माणूस कान्हाचे वडील सीताबराव होते. कान्हाच्या जाण्यानंतर एका वर्षभरात कान्हाची आई गयाबाई गेल्या.

आता घरामध्ये कान्हाची पत्नी मालती, कान्हाची दोन मुलं विजय आणि सुजय, कान्हाचे वडील एवढेच काय ती माणसे उरले. महिन्याकाठी कान्हाच्या नावावर आजही पैसे येतात. त्या पैशांवर आणि दीड एकर जमिनीवर काबाडकष्ट करत ही महिला कान्हाचे कुटुंब आनंदात ठेवायचा प्रयत्न करते. मालतीशी बोलताना हे सगळे विषय पुढे येत होते.

मी हिंमत करत मालतीला म्हणालो, ताई, इतक्या कमी वयामध्ये तुमचे पती हुतात्‍मा झाले. तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का ? मालती काही बोलणार तितक्यात कान्हाचे वडील म्हणाले, अहो, आम्ही सगळ्यांनीच तसा आग्रह धरला होता. तरुण मुलगी, आख्खे आयुष्य काढायचं. म्हातारपणामध्ये नातेवाईक, मुले आपले कोणी नसते.

आपला आधार म्हणजे आपला जोडीदारच असतो. हे आम्हालाही कळतं. आम्ही मालतीच्या आई-वडिलांना विनंती केली होती, तुम्ही मालतीच्या लग्नाचं काहीतरी पाहा. मालतीच्या आई-वडिलांचा विचार होता, पण मालतीचा मात्र त्यासाठी नकार होता. मालती म्हणाली, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला एखाद्या सैनिकाची पत्नी म्हणून समजून घ्यावं लागेल.

तुमचा नवरा देश सेवेसाठी हुतात्मा झालाय, हे मेडल जेव्हा एखाद्या सैनिकाच्या पत्नीला मिळते. तेव्हा तिला आयुष्यामध्ये अजून दुसरं काहीही हवं नसतं. माझे पती मला नेहमी सांगायचे, मी अशा ठिकाणी काम करतोय, जिथे उद्या काय होईल हे सांगता येत नाही. जर मला असं काही झालं तर तू नक्की तुझा दुसरा संसार थाट. भले तुला लोक काही म्हणतील. समाज नाव ठेवेल, पण तू तुझे आयुष्य एकटी नको जगू.

कान्हाला अग्नी देण्याच्या पूर्वी जेव्हा धाड धाड बंदुकाच्या गोळ्यांनी कान्हाला सलामी देण्यात आली, तेव्हा त्या बंदुकीचा आवाज मला सांगत होता, मी सर्वसामान्यांची बायको नाही. मी एका अशा व्यक्तीची बायको होते, त्याच्या बहादुरीमुळे अवघा देश त्याला सन्मानाने सलाम करतो. त्याच्यासमोर श्रद्धेनं नतमस्तक होतो.

जेवढा सन्मान मला कान्हानं मंगळसूत्र घालून दिला. तेवढाच सन्मान मला एका हुतात्मा सैनिकाची पत्नी म्हणून मिळाला. असे असताना मी दुसरं कोणासोबत तरी लग्न करायचं, याला मन कधीही तयार होणार नाही.

माझी गाडी मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाली. माझ्या मनात विचाराचे काहूर माजलं होतं. मालतीचा कान्हा आता कधीच परत येणार नाही, तरीही तो त्या मुलांच्या रूपाने आपल्यात आहे, असा समज त्या मालतीचा आहे.

एका महिलेला जिवंतपणे खूप साऱ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. नवरा अकाली गेल्यावर त्या जबाबदाऱ्या अजून घट्ट बसतात. तिचं एकटेपण तिला अजून जास्त खायला लागते. तिला खूप त्रास होतो. सामाजिक जबाबदाऱ्यांचा तिला त्रास होतो. त्या भयानं एकटेपणातून ती मार्ग काढत काढत आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेकांचा आधार बनण्याचं काम करत असते. बरोबर ना ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com