VIDEO : "कोरोनानं न्हाय..आधी पाण्यावाचून मरू!" महिलांची थक्क करणारी आपबिती

Water_Problems.jpg
Water_Problems.jpg

नाशिक : धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र बनत चाललीय. ग्रामीण भागात महिलांना भरउन्हातही हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच महिलांना एका हंड्यासाठी तब्बल दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. हे चित्र बघावयास मिळत आहे ते त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात. 

थेंब थेंब पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती 
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांश गावांतील विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही की पाण्याचे टॅंकर नाहीत. त्यामुळे दरेवाडी आणि परिसरातील पाच ते सहा वाड्या-वस्त्यांवरील महिलांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी दररोज दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. गावापासून पाच किलोमीटरवर असणाऱ्या विहिरीवरून हंडाभर पाणी आणण्यासाठीच त्यांना संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागत आहे.

त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दहा किलोमीटरची पायपीट 

मिळालेले पाणी कसे काय आहे हे न पाहता आपली तहान ग्रामस्थांना भागवावी लागत आहे. एकीकडे संपूर्ण देश, राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील या नागरिकांना मात्र साधे प्यायला पाणी मिळत नसल्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहतेय. कोरोनामुळे नाही, तर कोरोनाआधी पाण्यावाचून मरू, अशी कैफियत या भागातील महिलांनी "सकाळ'शी बोलताना मांडली. 

कोरोना नव्हे पाण्यावाचून मरू! 
लोणवाडी येथील महिलांनी सांगितले, की गावात पाणीच नाही, त्यामुळे दररोज दहा किलोमीटर डोक्‍यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कोरोनाची भीती वाटते, मात्र गावात प्यायला पाणीच नसल्याने कोरोनाआधी पाण्यावाचून मरू. विहिरीला जे पाणी आहे ते पण खूप गढूळ आहे, पण दुसरी सोयच नसल्याने हेच पाणी प्यावे लागत आहे. 
दुसऱ्या एका महिलेने सांगितले, की आमच्या चार-पाच वाड्यांतील विहिरी आटल्या आहेत. गावात पाण्याची सोय नाही. त्यामुळे दररोज पाण्यासाठी दहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. शहराप्रमाणे गावातही घरात नळाने पाणीपुरवठा व्हायला हवा. पाण्यासाठी बाहेर पडताना कोरोनाची भीती वाटते पण पाण्यासाठी हंडे घेऊन बाहेर पडावेच लागते, पाणी नसले तर काय करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

प्रशासनाची अनास्था; ग्रामस्थांच्या नशिबी 
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस याच इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात पडतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणेही याच परिसरात आहेत. मात्र तरीही प्रशासनाच्या अनास्थेमुळे वर्षानुवर्षे या भागातील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी करावी लागणारी वणवण तशीच कायम आहे. यंदा तर कोरोनामुळे या भागातील ग्रामस्थांच्या हाताला काम नाही, खायला पुरेसे अन्न आणि प्यायला साधे पाणीही नाही, अशा परिस्थितीत जगण्याचे मोठे आव्हान पेलत हे ग्रामस्थ जगण्याचा संघर्ष करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com