soldier.jpeg
soldier.jpeg

तेलंगणात अडकलेल्या सैनिकांना मिळेना दाद!..अनेक मेल करूनही नाही प्रतिसाद

नाशिक : भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या 31 मार्चला सिकंदराबाद लष्कराच्या तळावर निरोप समारंभ झाला. मात्र त्याचदरम्यान देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने, महाराष्ट्रातील 55 निवृत्त जवान तेथेच अडकले आहेत. इतर राज्यांनी त्यांच्या सैनिकांना ऑनलाइन परवानगी दिल्याने, तेथील जवान त्यांच्या कुटुंबीयांमध्ये परतले. पण राज्यातील जवानांनी परवानगीसाठी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांकडे अनेक मेल करूनही कुणालाच प्रतिसाद न मिळाल्याने जवान अडकून पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 

पोलिस महासंचालकांना मेल : निरोप समारंभाला गेले अन्‌ अडकले 
भारतीय लष्करात सेवा बजावलेल्या देशातील जवानांची अखेरच्या टप्प्यातील सेवा सिकंदराबाद (तेलंगणा) येथील ईएमई लष्करी तळावर केली. त्या जवानांचा 31 मार्चला निरोप समारंभ झाला. त्यानंतर 1 एप्रिलला निवृत्त जवानांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगीही लष्कराने दिली. मात्र, त्याचदरम्यान लॉकडाउनची मुदत वाढविल्याने घराकडे निघालेले महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मु-काश्‍मीर, गुजरात या राज्यांचे जवान सिकंदराबाद तळावर अडकले. 
पण इतर राज्यांतील जवानांनी त्यांच्या घरी परतण्यासाठी त्यांच्या राज्यांच्या पोलिस महासंचालकांकडे रीतसर ऑनलाइन अर्ज केले. त्यात, जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांचे तेलंगणापासून अंतर अधिक असल्याने तेथील जवानांना थांबविण्यात आले, तर त्यानुसार राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांनी ऑनलाइन परवानगी दिल्याने, त्या त्या राज्यातील जवान लष्करी वाहनातून त्यांच्या राज्याकडे रवाना झाले; परंतु महाराष्ट्रातील जवान परवानगीविना अडकून पडले आहेत. 

महाराष्ट्राचे 55 जवान अडकून 
सिकंदराबाद लष्करी तळावर अडकलेल्या 55 जवानांत उत्तर महाराष्ट्रातील पाच असून, नाशिकचे दोन, जळगाव, चाळीसगाव व धुळ्यातील प्रत्येकी एक जवान आहे. यातील प्रत्येक जवानाने राज्यात परतण्यासाठी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयास परवानगी मिळण्यासाठी ईमेलद्वारे अर्ज केला आहे. मात्र गेल्या 26 दिवसांत एकाही मेलला पोलिस महासंचालक कार्यालयाकडून उत्तर आलेले नाही. इतर राज्यांनी त्यांच्या जवानांना ऑनलाइन परवानगीपत्र दिलेले असताना महाराष्ट्र पोलिस महासंचालकांकडून मात्र जवानांची परवानगीसाठी अडवणूक केली जात असल्याची भावना या जवानांमध्ये आहे. 

साऱ्या नियमांची पूर्तता करणार 
जवानांनी पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या मेलमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबतच्या सगळ्या नियमांच्या पूर्ततेचे आश्‍वासन दिले आहे. लष्करी तळावरील डिस्चार्ज कागदपत्र, वैद्यकीय चाचणीचे प्रमाणपत्र, वैयक्तिक प्रतिज्ञा प्रमाणपत्र, गावी आल्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याची हमी, प्रवासात आवश्‍यक खाण्या-पिण्याच्याच वस्तू असे सगळे सोपस्कार पूर्ण असूनही पोलिस महासंचालकांकडून जवानांच्या मेलला प्रतिसाद मिळालेला नसल्याचे हे प्रकरण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com