नाशिककरांनो,..नाशिक राहण्यायोग्य आहे का?..केंद्र सरकार विचारतंय!

Nashik.jpg
Nashik.jpg

नाशिक : स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे राहण्यायोग्य शहरांचे (ईच ऑफ लिव्हिंग) गुणांकनाच्या आधारे रॅंकिंग देण्याचा निर्णय घेतला असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. 
देशभरातील 114 शहरांमधून ऑनलाइन 24 प्रश्‍न विचारून तुमचे शहर राहण्यायोग्य वाटते का, असा थेट सवाल नागरिकांना विचारला असून, त्यानुसार राहण्यायोग्य शहराचे रॅंकिंग निश्‍चित केले जाणार आहे. 

शहराचे व नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे मूल्यांकन केले जाणार

1 ते 29 फेब्रुवारीदरम्यान प्रश्‍नावली भरून घेतली जाणार असून, नागरिकांच्या दैनंदिन राहणीसंदर्भातील मते जाणून घेतली जाणार आहेत. नागरिकांच्या फिडबॅकनुसार शहराचे व नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे मूल्यांकन केले जाणार आहे. 
केंद्रीय समितीतर्फे मूल्यांकन होणार असल्याची माहिती स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. 

याविषयावर आहेत प्रश्‍न 

शहरातील शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य, निवासाची व्यवस्था, स्वच्छता, कचरा गोळा करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, रस्त्यावर किती प्रमाणात पाणी तुंबते, शहरातील नागरिकांची सुरक्षितता, दळणवळण व्यवस्था, तत्काळ उपलब्ध होणाऱ्या सुविधा, 
मनोरंजनाची साधने, कौशल्य विकासाची साधने, आर्थिक व्यवहार, नागरिकांची क्रयशक्ती, वायूप्रदूषणाचा स्तर, हरित क्षेत्राची माहिती, वीजपुरवठा सुरळीत होतो का? तसेच संशोधन, सुरक्षित प्रवास आदींबाबत माहिती विचारली जाणार आहे. सर्व प्रश्‍न नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आहेत. ऑनलाइन https://eol2019. org/ citizenfeedback लिंकवर किंवा क्‍यूआर कोड स्कॅन करून सर्वेक्षणात सहभागी होता येईल. 

पहिल्या 20 ते 22 मध्ये नाशिक 

नाशिक शहर राहण्यायोग्यच असल्याचे केंद्र सरकारच्या यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. महापालिका, पोलिस प्रशासनासह 16 विभागांकडून यापूर्वी माहिती मागविली होती. त्यानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे आता कमीत कमी एकूण लोकसंख्येच्या एक टक्के नागरिकांनी जरी फिडबॅक फार्मच्या माध्यमातून अभिप्राय नोंदविल्यास नाशिकची खरी ओळख देशभर पोचेल. 

नाशिकला असा होणार फायदा 

नाशिक राहण्यायोग्य असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीवरून दिसत आहे. 
नाशिकचे हवामान आल्हाददायक, प्रदूषणमुक्त असल्याने अनेकजण नाशिकमध्ये राहण्यासाठी येतात. पहिल्या दहामध्ये शहर आल्यास डाटा तयार होऊन तो जागतिक पातळीवर पोचणार आहे. सरकारकडून विशेष निधी प्राप्त होण्याची दाट शक्‍यता आहे. तर या माध्यमातून मोठी गुंतवणूक होईल, असा दावा श्री. थविल यांनी केला. 

केंद्र सरकारला सांगायचे आहे

नाशिक राहण्यायोग्य शहर आहेच, आता ऑनलाइन फिडबॅकच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र सरकारला सांगायचे आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा. - प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com