Nandurbar Protest News : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून आंदोलनांच्या माध्यमातून लढा सुरू आहे. आंदोलन एका रात्रीतून उभे राहिले नसून सतत तीन वर्षांपासून लढा सुरू आहे. आंदोलन करणारे विरोधक नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत राज्यकर्त्यांना जाग आली नाही.
दुर्दैवाने सारंगखेडा येथील पुलाला पडलेल्या भगदाडानंतर त्यांना जाग आली. ते विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी वक्तव्य करीत असले, तरी आम्ही रस्त्यांच्या आंदोलनावर ठाम असून, येत्या ५ ऑक्टोबरला नियोजित स्थळी सगळ्यांना सोबत घेऊन आंदोलन होणार म्हणजे होणारच, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले. (Abhijit Patil statement about protest for roads nandurbar news)
तालुक्यातील शहादा-शिरपूर, शहादा-सारंगखेडा व शहादा-जयनगर या प्रमुख रस्त्यांची पूर्णता वाताहत झाली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जण जायबंदी झाले, तर काही जिवानिशी गेले. रस्ता दुरुस्त होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या हालअपेष्टा दूर व्हाव्यात यासाठी तीन वर्षांपासून शेतकरी संघर्ष समिती, विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत
परंतु आजपर्यंत प्रशासनातर्फे केवळ आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कृती करण्यात आली नसल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वसामान्य नागरिक ५ ऑक्टोबरला होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनावर ठाम आहेत.
या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आजपर्यंत शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, प्रवासी यांसह असंख्य सर्व सामान्य नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थोडादेखील अंदाज राज्यकर्त्यांना येत नसल्याने त्यांच्याकडून आंदोलनाबाबत वेगवेगळे वक्तव्य येत असल्याच्या टोला आंदोलकांमार्फत लगावला जातोय.
श्रेय घेण्याचे वक्तव्य दुर्दैवी व चुकीचे
आंदोलनाबाबत पाटील म्हणाले, की विविध राजकीय पक्ष, संघटनांचा सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यांसाठी तीन वर्षांपासून लढा सुरू आहे. हे आंदोलन एका रात्रीतून उभे राहिलेले नाही. आजपर्यंत झालेल्या आंदोलनाची दखल स्थानिक आमदार, खासदारांनी घेतली नाही. उलट पक्षी आंदोलनाबाबत त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे व दुर्दैवी आहे.
विशेष म्हणजे आंदोलन करणारे विरोधक नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली नसती. कोणी कितीही वक्तव्य केले तरी आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची स्पष्टोक्ती श्री. पाटील यांनी दिली.
स्थानिक अनभिज्ञ
दरम्यान, तीन वर्षांपासून या प्रमुख रस्त्यांची झालेली वाताहत पाहता आजपर्यंत स्थानिक राज्यकर्त्यांना कुठलेही सोयरसुतक नसल्याचेही सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. रस्त्यांची चाळण झाल्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत पोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही बोलले जात आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूकदार सारेच या रस्त्याने बेजार झाले आहेत.
त्याचबरोबर सारंगखेडा येथील पुलाला पडलेल्या भगदाडानंतर वाहतूक बंद करण्यात आली. या घटनेला आठवडा होत आला; परंतु साधी भेटही स्थानिक राज्यकर्त्यांनी दिली नाही. या घटनांबाबत अद्यापही स्थानिक राज्यकर्ते अनभिज्ञ आहेत का, असा खोचक सवालही सर्वसामान्य नागरिकांमधून सोशल मीडियातून अनेक वेळा व्यक्त होत आहे.
"तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तीन वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यासाठी आंदोलने करीत आहोत. जनतेचे प्रश्न वारंवार रस्त्यावर उतरून सोडवावे लागत आहेत हे मोठे दुर्दैव आहे. आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटावा यासाठी लढत असून, राज्यकर्ते मात्र याला श्रेय घेण्याच्या प्रकार म्हणत असतील तर त्यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे व दुर्दैवी आहे. रस्त्यांची झालेली वाताहत पाहता आंदोलन होणारच." -अभिजित पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.