म्हसदी : ग्रामीण भागात शेती व्यवसायाच्या मदतीने अर्थकारण फिरत असते. यंदाच्या दुष्काळाच्या झळा शेती व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाला बसत आहेत. ग्रामीण भागातील लहान व्यवसायांनाही दुष्काळी स्थितीचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात स्थायिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल असे व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र आहे. (Dhule Drought Yarn business in Mhasdi is on verge of extinction)
पूर्वी म्हसदी गावात सुतापासून तयार होणाऱ्या विविध सुबक वस्तूंमुळे गावाची वेगळी ओळख होती. मुस्लिम बांधव करत असलेल्या व्यवसायाला घरघर लागली आहे. तथापि, सुताचा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हसदीतील मुस्लिम कुटुंबातील कारागिरांचा सुतापासून भोयर, सतरंजी, झोऱ्या, बसकर यांसारख्या आकर्षक वस्तू तयार करण्याचा हातखंडा होता.
प्राथमिक शाळेच्या धुळे जिल्हा भूगोल पुस्तकात म्हसदी येथील सुताच्या व्यवसायाचा उल्लेख असून, हा व्यवसाय आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अलीकडे सुताचे वाढलेले दर आणि दुष्काळी स्थितीमुळे हस्तकला मागे पडत चालली आहे. म्हसदी गाव धुळे जिल्ह्यात राजकीय पटलावर कायम चर्चेत असते.
म्हसदीत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचा वावर असतो, तो सुताची सतरंजी, झोरे, बसकर घेण्यासाठी. सुताच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. यदांच्या दुष्काळाची झळ या व्यवसायाला बसल्याचे चित्र आहे. मुस्लिम कुंटुबातील सदस्य व इतर कारागिरांचा उदरनिर्वाह यातून चालतो. वाढत्या महागाईची झळ बसली असली तरी गावाची ओळख टिकविण्यासाठी व्यवसाय तग धरून आहे.
सुताच्या व्यवसायाला घरघर
मोठ्या शहरात यंत्रमागावर सुताच्या वस्तू तयार केल्या जातात. तिथे अशा व्यवसायांना सुगीचे दिवस असले तरी ग्रामीण भागातील हातमागावर हस्तेकलेतून तयार केल्या जाणाऱ्या सुताच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. कारण सुताचे भाव प्रचंड वाढले आहेत. मागणी असली तरी महागडे सूत आणून मुबलक वस्तू बनवून ठेवणे मुस्लिम कारागिरांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. (latest marathi news)
अलीकडे जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. घराघरात अत्याधुनिक गाद्या, चादरी, गालिचा, कार्पेट आदींचा वापर केला जात आहे. मात्र ग्रामीण भागात आजही सुतापासून तयार केलेल्या सतरंज्या, जमिनीवर अंथरण्याच्या रंगीत पट्ट्या यांचा वापर होतो. दीडशे वर्षांपूर्वी केवळ एका वृद्ध मुस्लिम कारागिराने सुतापासून वस्तू बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.
नंतर हा व्यवसाय वाढतही गेला. अनेक कुटुंबे सुताच्या कलाकुसरीत पारंगतही झाले. पुरेशा आर्थिक भांडवलाअभावी व दुष्काळी स्थितीमुळे हा व्यवसाय अडचणीतच नाही तर बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खंतही कारागिरांनी व्यक्त केली.
शासकीय यंत्रणेची उदासीनता
यंत्रमाग, हातमाग हा स्वदेशी लघुउद्योग पूर्वी मोजक्या भांडवलात व हस्तकलेवर चालत असे. अलीकडे या व्यवसायाला अडचणींचा डोंगर आणि महागाईचा तडाखा बसला आहे. यंदा दुष्काळाने भर घातली आहे. पंधरा वर्षांत सुताचे भाव चारपट वाढले आहेत. त्यामुळे कारागिरांना व्यवसाय टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
शासनाने विविध विभागांतील खादी ग्रामोद्योग, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी या कारागिरांना व ग्रामीण हस्तकलेपासून तयार होणाऱ्या सुताच्या वस्तूंची स्वतः दखल घेत प्रोत्साहन देत ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाचे पाठबळही होते
धुळ्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी त्या जिल्हाधिकारी असताना या कारागिरांना वेळोवेळी प्रोत्साहनही दिले होते. मुंबई येथे खादी ग्रामोद्योग विभागातर्फे या कारागिरांना सात दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार होते.
शासनाकडून सुताच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी व वस्तूला नवे आकर्षक रूप मिळावे, कारागिरांना कायमचा रोजगार मिळावा यादृष्टीने हे प्रशिक्षण दिले जाते; परंतु मुंबईत स्वखर्चाने हे प्रशिक्षण घेणे येथील कोणत्याही कारागिराला आर्थिक स्थितीमुळे शक्य नव्हते.
"दिवसेंदिवस सुताचे दर प्रचंड वाढत आहेत. महागडे सूत खरेदी करून तयार केलेली आकर्षक वस्तू तत्काळ विकणे आवश्यक असते. मोठी आर्थिक गुंतवणूक करत हा व्यवसाय करणे अवघड आहे. शिवाय दुष्काळाचा परिणाम आहेच." -हाजी भिकन सुपडू पिंजारी, ज्येष्ठ हातमाग कारागीर, म्हसदी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.