पालकांनो, पावसाळ्यातही लावा बिनधास्त विवाह; पंचांगानुसार या आहेत तिथी...

पालकांनो, पावसाळ्यातही लावा बिनधास्त विवाह; पंचांगानुसार या आहेत तिथी...

कापडणे (जि. धुळे) ः "कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव पाहता तीन मेपर्यंत "लॉक डाउन' जाहीर करण्यात आला आहे. याचा विविध उद्योग- व्यवसायांना फटका बसला आहे. "लॉक डाउन'मुळे यंदा प्रथमच विवाह सोहळेही ठप्प झाल्याने मंगल कार्य असणाऱ्या कुटुंबीयांसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचाही हिरमोड झाला. मात्र, काही पंचांगानुसार पावसाळ्यातील जून, जुलै, ऑगस्ट या तिन्ही महिन्यांत भरगच्च विवाह तिथी नमूद करण्यात आल्याने पावसाळ्यातही बिनधास्त विवाह लावा, असा सल्लाही पुरोहितांनी दिला आहे. 

तीन महिन्यात 34 तिथी 
तुळशी विवाहानंतर सर्वत्र लग्नांचा हंगाम सुरू होतो. विशेषतः सुट्यांमुळे मार्च ते जूनदरम्यान विवाहांची संख्या मोठी असते. पावसाळा सुरू झाला, की विवाह रोडावतात. यंदा मात्र ज्यांचे विवाह जुळले त्यांना "कोरोना'मुळे मोठा अडसर आला. विवाहांच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतरही ते स्थगित करावे लागले. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. पावसाळ्यात विवाह तिथींचा पुरोहितही विचार करत नाहीत. मात्र, बदललेली सद्यःस्थिती आणि आधुनिक विचारांमुळे आता पावसाळ्यातही विवाह लावा, असा सल्ला पुरोहितांनीच दिला आहे. एक जुलैला कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर केवळ खानदेशात विवाह सोहळे बंद होतात. याचा अर्थ पंचांग बंद होत नाही. यामुळे पावसाळ्यातही काही पंचांगानुसार अनेक विवाह तिथी आहेत. यात जूनमध्ये 11, जुलैमध्ये 11, तर ऑगस्टमध्ये 12 विवाह तिथी असल्याचेही ते नमूद करतात. 

या आहेत विवाह तिथी 
जून : 1, 2, 7, 9, 10, 11, 14, 15, 28, 29, 30 
जुलै : 2, 7, 11, 12, 13, 14, 23, 25, 26, 29, 31 
ऑगस्ट : 3, 4, 7, 13, 14, 21, 23, 24, 28, 29, 30, 31 


पावसाळ्यात शेतीकामांना प्राधान्य दिले जात असल्याने पूर्वापार विवाह सोहळे होत नसत. मात्र, पावसाळ्यातही पंचांगांमध्ये विवाह तिथी नमूद असतात. यंदाही अशा अनेक तिथी आहेत. यामुळे "लॉक डाउन' शिथिल झाल्यानंतर पावसाळ्यातही विवाह सोहळे होऊ शकतात. त्यासाठी यजमानांनी "कोरोना'ची स्थिती लक्षात घेत शासनाच्या नियमांचे पालन करणेही आवश्‍यक आहे. 
- दुर्गेश जोशी, पुरोहित, कापडणे 

खानदेश वगळता इतरत्र पावसाळ्यातही विवाह होतात. तो एक पवित्र संस्कार असून, "मुहूर्ता'ची अडचण नसते. यंदा "कोरोना'मुळे अडचणी निर्माण झाल्या. "लॉक डाउन' शिथिल झाल्यानंतर पावसाळ्यातही विवाहांसाठी काहीच अडचणी नाहीत. मोजक्‍याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत शासनाच्या सूचनांचे पालन करत ते लावता येतील. यातून यजमान कुटुंबीयांचीही आर्थिक बचत होईल. 
- आबा जोशी, पुरोहित, धुळे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com