गुलाबराव पाटील, पाडवींचे राज्यात मंत्रिपद निश्‍चित!

गुलाबराव पाटील, पाडवींचे राज्यात मंत्रिपद निश्‍चित!

जळगाव : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचा उद्या (ता. 28) शपथविधी होत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात खानदेशातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील व के. सी. पाडवी यांना मंत्रिपद मिळणार हे निश्‍चित झाले आहे. या शिवाय राज्यमंत्रिपदावर कॉंग्रेसचे धुळ्याचे कुणाल पाटील व जळगावच्या रावेर मतदार संघातील शिरीष चौधरी यांच्यापैकी कुणाचा नंबर लागणार याबाबत उत्सुकता आहे. 

राज्यात कॉंग्रेसचे आणि त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार असताना खानदेशला मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळाले आहे. यावेळी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाविकास आघाडीत चांगले स्थान मिळण्याचे संकेत आहेत. खानदेशातील 20 जागांपैकी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला नऊ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला चार, शिवसेनेला चार, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली असून दोन अपक्ष निवडून आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत; तर धुळे शहर मतदार संघातून एमआयएमचा उमेदवार विजयी झाला आहे. 

तर किशोर पाटलांनाही संधी 
युती सरकारच्या मंत्रिमंडळात खानदेशला तीन मंत्रिपदे यात भाजपचे गिरीश महाजन व जयकुमार रावल हे कॅबिनेट मंत्री होते; तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री होते. भाजपचे एकनाथराव खडसे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांना बढती मिळून कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याकडे कोणते खाते येणार, याची उत्सुकता आहे. याशिवाय पक्षातर्फे एक राज्यमंत्रिपद दिले गेल्यास पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना संधी मिळून शकते. 

कॉंग्रेसच्या बळकटीसाठी आमदार चौधरींना पद 
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी येथे सातव्यांदा निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांचेही मंत्रिपद निश्‍चित मानले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे; तर धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीणचे कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये फाटाफूट होत असताना ते कॉंग्रेससोबत ठाम राहिले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे; तर जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसच्या कोट्यातून रावेर येथील आमदार शिरीष चौधरी यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसला जिल्ह्यात एकही मंत्रिपद नव्हते. गेल्या अनेक वर्षांत जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वाट्याला मंत्रिपद आलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस अधिकच कमकुवत झाली. कॉंग्रेस बळकट करण्यासाठी यावेळी कॉंग्रेसचे रावेर येथील एकमेव आमदार चौधरी यांना राज्यमंत्रिपद हमखास मिळण्याची शक्‍यता आहे. 

डॉ. पाटलांना पुन्हा संधी? 
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट होती. एकेकाळी या पक्षाचे सहा आमदार जिल्ह्यात होते. मात्र, यावेळी केवळ अमळनेर येथून अनिल भाईदास पाटील हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातून अनेक नेते फुटून गेले. परंतु, जिल्ह्यातील एकही नेता फुटला नाही. जिल्ह्याने पक्षाला चांगली साथ दिल्याचे पक्षाचे नेते शरद पवारही यांनीही जाहीरपणे सांगितले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षाला आता ताकद देणे गरजेचे आहे. अशा स्थितीत एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र काही कारणामुळे त्यांना मंत्रिपद नाही दिल्यास पक्षाचा आक्रमक चेहरा असलेले व शरद पवार यांच्या विश्‍वासातील माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com