थंडीने केळी गोठवली: चारशेवरुन केवळ ४० ट्रक्स निर्यात 

थंडीने केळी गोठवली: चारशेवरुन केवळ ४० ट्रक्स निर्यात 

रावेर : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यासह तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे केळी निसवण्याच्या (कापणी योग्य होण्याच्या) प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून, कापणी योग्य केळीचे प्रमाण १० टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहे. एरवी हंगामात तीनशे ते चारशे ट्रक्स भरून केळी उत्तर भारतात निर्यात होत असताना सध्या हे प्रमाण अवघे ३५ ते ४० ट्रक्सपर्यंत खाली घसरले आहे. 

डिसेंबर अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा बराच खाली घसरला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तर पारा १० डिग्री सेल्सिअस पेक्षाही खाली घसरला आहे. थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार होत आहे. सध्या रावेर पट्ट्यातून दररोज फक्त १७ ते १८ आणि सावदा पट्ट्यातून दररोज केवळ २० ट्रक्स केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे. १५० ते २०० ट्रक्स केळी लिलाव होणाऱ्या बऱ्हाणपूर बाजार समितीत काल (ता. १०) फक्त २२ ट्रक्स केळीचा लिलाव झाला. 

मागणीही कमी 
जिल्ह्यात कापणी योग्य केळीचे प्रमाण कमी झाले. उत्तर भारतातून केळीची मागणीही खूपच कमी झाली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बर्फवृष्टीमुळे जम्मू आणि काश्मीर मधील रस्ते बंद असतात. तिथे केळीची मागणी असली तरीही तिथे ट्रक्स पोचू शकत नाहीत. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या भागात देखील केळीची मागणी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सध्या राजस्थानमध्ये जिल्ह्यातील केळीची मागणी आहे. दिवाळीनंतर केळीची कापणी कमी होत जाते तसे भावही कमी होत जातात. सध्या मागणी कमी, केळीची कापणी ही कमी आणि त्यामुळे भावही कमी आहेत. 

जानेवारी अखेरीस उठाव येणार 
जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून थंडी कमी होत जाऊन ऊन व तापमान वाढत जाणार आहे. यामुळे केळी कापणीसाठी तयार होण्याचे आणि कापणीचे प्रमाणही वाढणार आहे. या काळात निर्यातक्षम केळी मालाची कापणी ही सुरू होणार आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातून केळीची निर्यात सुरू होईल अशी चिन्हे आहेत. जून महिन्यापासून म्हणजे पाऊस सुरू झाल्यावर जिल्ह्यातील केळी निर्यात बंदच होते. 

चरक्याचा प्रभाव नाही 
तालुका आणि परिसरात काल (ता. ९) पासून थंडीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे आणि तापमानाचा पारा ९ डिग्री सेल्सिअसच्या आसपास आला आहे. अशी परिस्थिती आठवडाभर राहिली तर केळीवर चरका या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकेल. सुदैवाने आतापर्यंत तालुक्‍यात कुठेही चरका आढळून आला नाही अशी माहिती तालुका कृषी अधिकारी एस. आर. साळुंखे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com