Nandurbar News : उन्हाळ्याची सुरवात होताच विहिरी-कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिके वाचविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक येथील भाजीपाला मार्केटमध्ये घटली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा दररोजच्या जेवणातून पालेभाज्या बाद होऊन त्यांची जागा तृणधान्याच्या डाळींनी घेतली आहे. (Nandurbar Vegetable Rate Hike Inflow of vegetables decreased in market during summer)
नंदुरबार बाजार समितीचे येथील भाजीपाला मार्केट गुजरात-मध्य प्रदेशमधील भाजीपाला पुरवठा करणारे जंक्शन ठरले आहे. नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे थेट नाशिकपासून भाजीपाला नंदुरबार बाजारात विक्रीसाठी येतो. या ठिकाणी लगतच्या गुजरात व मध्य प्रदेशमधील सीमावर्ती भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यामुळे नंदुरबार भाजीपाल्याचे ‘हब’ बनले आहे.
येथून सुरत, मुंबई, नाशिक, पुणे, मध्य प्रदेशमधील इंदूरपर्यंत भाजीपाला विक्रीसाठी व्यापारी घेऊन जातात. त्यात अनेकदा गुजरात-मध्य प्रदेशमधील उत्पादित भाजीपाला तेथील घाऊक व्यापारी नंदुरबार येथे विक्रीसाठी पाठवितात, तर येथील भाजीपाला त्या ठिकाणी पाठविला जातो. त्यासोबतच कांदा व लसणाची मोठी बाजारपेठ येथे आहे. येथील कांदा थेट उत्तर प्रदेशमध्ये घाऊक व्यापारी घेऊन जातात. त्यामुळे येथील भाजीपाला बाजारपेठेला विशेष महत्त्व आहे.
डाळींनी घेतली जागा
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे विहिरी-कूपनलिकांची पाणीपातळी घटली आहे. शेतकऱ्यांनी लावलेले भाजीपाला पीक वाचविणे कठीण आहे. पाण्याअभावी अनेक पिके कोमेजली. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली. परिणामी सध्या बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त अशी असमतोल परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. लग्नसराई सुरू असून, काही भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत. सर्वसामान्यांना पालेभाज्या घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा दररोजच्या जेवणाच्या ताटातून पालेभाज्या बाद होऊन त्यांची जागा आता मूगडाळ, चवळी, हरभरा, वाटाणे, उडीदडाळीने घेतली आहे.
परराज्यातून येणारा भाजीपाला
नंदुरबार जिल्ह्यात वांगे, कोथिंबीर, टोमॅटो, कोबी, वाल, भोपळा, कारले ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. नाशिक जिल्ह्यातून टोमॅटो मोठ्या प्रमाणात येतो. परराज्यातून गुजरातमधून काळे वांगे, गड्डा कोबी, वाल, वाटाणे, सिंगा, गिलोडी, तर मध्य प्रदेशमधून बटाटे, आले, लसूण विक्रीसाठी येत असतात.
"लग्नाच्या जेवणात गिलोडीस बटाटे, वांगे, कोथिंबीर, अद्रक (आले) या भाज्या खानदेशात हमखास असतात. त्यामुळे या प्रकारातील भाज्यांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनाही माल मिळत नाही, अशी स्थिती आहे."-धर्मेंद्र माळी, भाजीपाला विक्रेता, नंदुरबार
भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो रुपयात) ः
वांगे - ८० ते १००
वाल - ६० ते ८०
कोबी - ८० ते १००
बटाटे - ६० ते ८०
हिरवी मिरची - १०० ते १२०
कोथिंबीर - १५०
अद्रक - ८० ते १००
मेथी - १००
पालक - १०० ते १२०००
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.