Nashik Smart City : पंचवटी परिसरातील रस्त्यांच्या बाजूला काही बांधकाम व्यावसायिक डेब्रिज टाकून शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात येणारे भक्त- भाविक, पर्यटकांना विद्रूपीकरणाचे दर्शन होत आहे.
याकडे मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही डोळेझाक करीत असल्याने स्मार्ट सिटीचे सौंदर्य मातीमोल होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. (beauty of smart cities is wasted due to debris nashik news)
पंचवटीतील रामतीर्थ, तपोवनात येथे जगभरातून पर्यटक आणि भक्त-भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, परिसरातील अनेक रस्त्यांना सध्या मलब्याचे ग्रहण लागलेले दिसत आहेत. संत गाडगे महाराज पुलाच्या पुढे असलेले फुटपाथ, अमरधाम रोड, तपोवनात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, रामवाडी ते चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा बांधकामाचे खराब मटेरियल पडलेले आढळते.
हनुमान वाडी ते मोरेमळा या दरम्यानचा रस्ता, मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवार, औरंगाबाद रोड, पेठ रोड ते मखमलाबाद लिंक रोड, तपोवन ही ठिकाणे तर बांधकामाचा मलबा टाकण्यासाठीच प्रसिद्ध होत आहेत. या मार्गांवर व्यावसायिकांनी जुनी इमारत तोड़ून त्यातून निघालेले डबर, दगड, माती, तुटलेल्या विटा, शौचालयांची भांडी आदी वस्तू या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या आहेत.
या प्रकारामुळे रस्त्यांचे विद्रुपीकरण तर होतेच; शिवाय रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, प्रशासन या गोष्टींकडे लक्ष द्यायला तयार नाही. या प्रकारांमुळे महापालिकेच्या ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ या ब्रीद वाक्याला तडा जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बांधकामाचा मलबा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चर्चेचा विषय
स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात विकासकामे सुरू आहेत. यातच रामतीर्थ, गोदाघाट परिसरातही काम सुरू आहे. एकीकडे शहर सुशोभिकरणाची कामे जोमात सुरू आहेत. परंतू, अनेक रस्त्यांलगत पडलेल्या डेब्रिजमुळे शहराचे सौंदर्य मातीमोल होत असल्याची चर्चा पंचवटीकरांमध्ये सुरू आहे.
"प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्त-भाविक, पर्यटक येत असतात. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, म्हणून मनपा प्रशासन विविध उपक्रम हाती घेत त्या अनुषगाने कामेदेखील करत आहे. परंतु, रस्त्यालगत पडलेल्या डेब्रिजमुळे येणाऱ्या भक्त-भाविकांना शहर विद्रुपीकरणाचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येते. त्यामुळे यावर त्वरित कारवाई करावी." -दत्ता बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.