Inspirational News: पती झाला परागंदा... ताराबाईच बनल्या कुटुंबप्रमुख
Inspirational News: जन्मापासूनच सुरू असलेला आव्हानांचा सामना पुढेही सुरूच राहिला... परिस्थितीमुळे इयत्ता पहिलीतच शाळा सोडावी लागली... नियतीनं दिलेलं दुःख कितीही भयानक असलं तरी नियतीलाच आव्हान देत ती उभी राहिली... यात कमी की काय, अशा परिस्थितीत मुलांसह तिची साथ सोडून पतीही परागंदा झाला... (Inspirational News Tarabai became head of family nashik news)
त्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, मात्र जन्माला आलेल्या मुलांचा काय दोष? या प्रश्नाचं उत्तर शोधतानाच मुलांसाठी आई आणि वडिलांचं भक्कम छत्र उभारताना प्रतिकूल परिस्थितीचा खंबीरपणे सामना करीत भाजीपाला विक्री व्यवसायावर संसार सावरलेल्या निफाड तालुक्यातील शिंगवे येथील ताराबाई वाघमारे महिलांसाठी ‘आयडॉल’ ठरल्या..!
ताराबाई केदू वाघमारे यांचं माहेर बागलाण तालुक्यातील पांढरूण येथील; तर सासर निफाड तालुक्यातील शिंगवे येथील. वडील साहेबराव केरू खैरनार यांचे पत्नी चंद्रभागाबाई यांच्यासह पाच मुली व दोन मुलगे असं खटल्याचं कुटुंब होतं. मोठ्या कुटुंबाला पुढे नेताना दारिद्र्यही पाठशिवणीचा खेळ खेळत होते. केरसुणी (झाडू) तयार करण्याच्या व्यवसायावरच कुटुंबाची गुजराण सुरू होती. खैरनार परिवारातील ताराबाई या क्रमांक चारच्या कन्या. परिस्थितीमुळे कुटुंबाला चिमुरड्यांनाही हातभार लावणे क्रमप्राप्त बनले.
कष्टमय आयुष्यानं बालपण हिरावलं
ताराबाई आणि त्यांची भावंडंही झाडू बननिण्याच्या कामात मदत करीत होती. वयाच्या आठव्या वर्षीच ताराबाई या आईकडून झाडू तयार करायला शिकल्या. मात्र, झाडू तयार करण्याबरोबरच त्यांना लखमापूर, तळवाडे आणि परिसरातील गावांमध्ये गावोगावी विक्रीसाठी जावे लागत होते. अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात सुरू असलेल्या या व्यवसायाशिवाय परिवाराला पर्यायच नव्हता. दिवसाला २० झाडू तयार करतानाच ते विक्रीसाठीही त्या नेत होत्या.
कुटुंबासमोर उभे राहिलं संकट
ताराबाई यांचा विवाह शिंगवे येथील केदू वाघमारे यांच्याशी झाला. त्यांचेही शिक्षण जेमतेम सातवी उत्तीर्ण. सासरी असलेली गरिबीची परिस्थिती जणू त्यांची वाटच पाहत होती. लग्नानंतर अवघ्या आठवडाभरातच शिंगवे परिसरात शेतमजूर म्हणून त्यांना जावे लागले. पतीकडून भक्कम साथ मिळत नव्हती.
यातच कुटुंबात पाच मुली व मुलगा अशी खाणारी तोडं वाढली. पहिल्या मुलीच्या लग्नानंतर वाघमारे कुटुंबात अचानक उलटफेर घडले. पत्नीसह चिमुरड्यांमधून अचानकपणे पती परागंदा झाला. त्यामुळे ताराबाईंसमोर काळोखच उभा राहिला. मात्र, जन्माला आलेल्या चिमुरड्यांचा दोष काय? या विचारात त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.
कोरोना महामारीने दिला आधार
पतीचा शोध घेऊनही त्यांना अपयश आले. अशातच कोरोनाची लाट आली. या लाटेत कामधंदा बंद असल्याने ताराबाई यांनी सायखेडा येथील एका बँकेत साफसफाईचे रोजंदारीवरील काम शोधले. मात्र, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांना या कामातही अडचणी उभ्या राहिल्या. डोळ्यांसमोर असलेल्या या प्रसंगात खचून न जाता त्यांनी या काळात स्वतःला खंबीर बनविले. त्यांनी सायखेडा येथील चौफुलीवर भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. प्रारंभी दोन हजारांचे भांडवल उभे करीत नाशिक येथून भाजीपाला आणून रस्त्यावर विक्री सुरू केली. येथूनच त्यांनी स्वतःला उभे करण्यासाठी जणू राजमार्गच शोधला.
खचून जाऊ नका
भाजीपाला विक्रीतूनच त्यांनी मुलींचे विवाह करतानाच स्वतःला सावरले. कुटुंबासाठी आई आणि वडील म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतानाच व्यवसायाच्या निमित्ताने महिलांसमोर आदर्श ठेवला. परागंदा झालेला पती नक्कीच परत येईल, अशा आशेवर त्या आपले आयुष्य भक्कमपणे पुढे नेताहेत. आयुष्यात आलेल्या परिस्थितीत महिलांनी खचून न जाता परिस्थितीलाच आव्हान दिले, तर नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, हेच ताराबाई यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होते. महिलांनी खचून न जाता संयम ठेवून आलेल्या परिस्थितीत खंबीरपणे सामोरे गेल्यास परिस्थिती बदलते, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.