Sakal Exclusive : नावीन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते; परंतु योग्य व्यासपीठ, मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. (Maharashtra Student Innovation Challenge initiative through various departments of Govt nashik news)
राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच, अर्ज करण्यासाठी विद्यार्थी/ विद्यार्थिनी/ समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संबंधित उपक्रम तीन टप्प्यांत घेण्यात येणार असून, प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात येईल.
उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. त्यांच्यासाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट दहा विजेते निवडले जातील. दहा विजेत्यांमध्ये ३० टक्के महिला, ५० टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बीजभांडवल देण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, नावीन्यता विभागाने केले आहे.
विजेत्यांना मिळणार पाच लाखांचे भांडवल
या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दहा अशा ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इनक्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून, त्यानंतर या नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे.
यातून सर्वोत्कृष्ट दहा नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाखांचे बीजभांडवल देण्यात येईल. शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.