
Sanjay Raut on BJP | भाजपच्या पायाखालची जमीन घसरली; शहांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांचे वक्तव्य
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येणार म्हणजे त्यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे.
विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने जनतेचा कल लक्षात आला असून कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल., असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut trolled BJP over amit Shah visit to nashik political news)
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, अमित शहा पुण्यात निवडणुकीसाठी येणार आहे म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकांत भाजपचा पराभव होईल.
विधान परिषद निवडणुकीत जे निकाल लागले त्यात एखादी जागा वगळता सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. हजारो शिक्षकांनी व पदवीधरांना त्यांचा कल स्पष्ट दिला. या निवडणुकीत भाजपला नाकारले.
तोच कौल या दोन निवडणुकीत दिसून येईल. राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही अशी स्थिती आहे. गुजरातकडून महाराष्ट्राच्या उद्योगांवर आक्रमण होत आहे. आता आपल्या मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रेम असलेल्या आसामचे मुख्यमंत्री आमच्या देव धर्मावर आक्रमण करू लागल्याचे ते म्हणाले.
बोहरी समाजाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना प्रधानमंत्री असतानाच उद्धव ठाकरेंना आमंत्रण होते, तेव्हा ते जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना बोलावले. बोहरी समाज अनेक वर्षांपासून बाळासाहेबांशी जोडला आहे. त्यामुळे त्या संदर्भात शंका घेण्याची गरज नाही.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
न्यायपालिका खिशात
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असे सांगितले तर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देखील चिन्ह शिंदे यांना मिळेल, अशा प्रकारची ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी देखील निकाल आपल्या बाजूने लागेल, असे वक्तव्य केले. न्यायपालिका त्यांच्या खिशात असल्यासारखे ते वक्तव्य करीत आहेत. न्याय पालिकेवर आमचा विश्वास असल्याने आम्ही त्यावर बोलणार नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.
प्रश्न विचारल्यावर धाडी
प्रधानमंत्री व सरकारला प्रश्न विचारले जातात त्यानंतर धाडी पडतात किंवा अटक केली जाते हे बीबीसी कार्यालयावर पडलेल्या धाडीवरून स्पष्ट होते. आम्ही त्याचे जिवंत उदाहरण आहोत. देशातील लोकशाही संकटात आहे.
ज्या देशात अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्राच्या बाबतीत फार कधी घडल्याचे स्मरणात नाही. आणीबाणी काळात वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लावली. त्यामुळे याच भाजपने जेलभरो केले. आता त्यांचे सरकार असताना मीडियाचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे.
राहुल गांधी व आम्ही त्यांना प्रश्न विचारले तेव्हा राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली. बीबीसीने डॉक्युमेंटरी केल्याने मुंबई, दिल्ली कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. उद्योगपती अदाणींनी अनेक माध्यम विकत घेतली आहेत, मग भीती कसली? आमचे गळे दाबून, तुरुंगात टाकून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
पंडित नेहरूपासून ते राजीव गांधींपर्यंत एक मधला काळ वगळला तर कोणत्याही राजवटीमध्ये या देशात अशा प्रकारचं वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत अघोरी कृत्य घडले नाही. या देशातील लोकशाही संदर्भात जगात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे राऊत म्हणाले.