येवला (जि.नाशिक) : ‘काबील बनो, कामयाबी तुम्हारे पीछे झक मारके आयेगी...’ हा थ्री इडियट्स चित्रपटातील डायलॉग आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर येथील चार मित्रांनी सार्थ ठरविला आहे. नोकरीच्या शोधात भटकण्यापेक्षा आपला हक्काचा व्यवसाय उभा करू, या विचाराने एकत्र आलेल्या या चार युवकांचा एका गाळ्याचा विस्तार थेट आठ गाळ्यापर्यंत पोचला आहे. (success-story-yeola-4-friends-nashik-marathi-news)
‘काबील बनो, कामयाबी तुम्हारे पीछे झक मारके आयेगी...’
तुमच्याकडे मेहनत, श्रमाची तयारी अन् यशाची ध्यानधारणा करण्याची क्षमता असली, की नक्कीच यशाकडे घौडदौड होऊ शकते, हे या चार युवकांनी तरुणाईला दाखविले आहे. भूषण मोरे, सोहम जाधव, प्रसाद लहरे आणि प्रतीक कायस्थ हे चौघे चांगले मित्र. तसे बघायला गेले, तर प्रतीक व भूषण कॉलेजपासूनचे मित्र. प्रतीकची आधीपासूनच मैत्री असल्याने ओळखीनेच सोहम आणि प्रसादची ओळख भूषणसोबत झाली. विचार जुळले की माणसे आपोआप जोडली जातात, हे त्यांच्या मैत्रीने दाखवले. कॉलेजला असताना जेव्हा नोकरीच्या चर्चा मित्रांमध्ये व्हायच्या तेव्हा प्रतीक आणि भूषण ते ऐकूनच लांब पळायचे. कारण त्यांना कळायला लागले तेव्हापासून नोकरी हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय होता. स्वतः शिकून दुसऱ्यांच्या हाताना काम द्यायचे अन् चार कुटुंबाचा आधार बनायचे, हे त्याचे स्वप्न होते.
एक पाऊल पुढे धाडसाने टाकले अन् ‘बळीराजा’वर शिक्कामोर्तब
सोहमचे कृषी सेवा केंद्र असल्यामुळे सायंकाळी काम झाल्यावर तो सगळ्यांना बोलावून घ्यायचा आणि मग रोजच नवीन नवीन व्यवसायावर चर्चा व्हायच्या. सगळी मित्रमंडळी आपली मते मांडायची. काय करावे ज्याने आपल्याला दोन पैसे मिळतील. कुणाची तरी चूल पेटेल, कुणीतरी आनंदी होईल, हा विचार मनात होताच. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपणही लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, ही मनातील सामाजिक बांधिलकी स्वस्थ बसू देत नव्हती. खूप विचार करून, अनुभवी लोकांचे सल्ले घेऊन, अनुभव ऐकून चौघांनी सर्वानुमते हॉटेल व्यवसाय करायचे ठरवले. अगोदर नावावर खूप चर्चा झाली. तब्बल आठ दिवस त्यांनी यातच घालून दिले. याचवेळी उभ्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याबद्दल (बळीराजा) आपुलकी आणि सहनभुतीने ‘बळीराजा’ नाव योग्य वाटले. सोहमच कृषी सेवा केंद्र, भूषण शेतकऱ्यांचा मुलगा, प्रतीकचे शेतकरी मित्र आणि प्रसादची वडिलोपार्जित शेती असे सगळे अन् शेतकऱ्यांबद्दलची असलेली आत्मीयता यातूनच त्यांनी हॉटेल व्यवसाय करायचे ठरवले. फारशी माहिती नसताना एक पाऊल पुढे धाडसाने टाकले अन् ‘बळीराजा’वर शिक्कामोर्तब झाले.
५० टक्के सवलतीची ऑफर
५ जुलै २०१७ ला एका गाळ्यात सुरू झालेले हॉटेल आता आठ गाळ्यांमध्ये सुरू आहे. सुरवातीला खूप अडचणी, संकटाना तोंड द्यावे लागले; पण त्यांनी हिंमत हरली नाही. भाज्यांची चव तर सर्वांना भावली. पण येथील दरही त्यांनी सर्वसामान्यांना परवडतील असेच ठेवले. यामुळे लोक आपुलकीने येऊ लागले. हळूहळू या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलत गेला. अल्पावधीतच झालेली प्रगती हीच बळीराजाच्या कामाची पोचपावती ठरली आहे. आज चौथा वर्धापन दिन साजरा करताना या युवकांनी ५० टक्के सवलतीची ऑफर दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.