Nandurbar News : कृषकांचे आराध्य दैवत असणारी बळीराजाला शाक व भाजीची पूर्ती करणारी, संपूर्ण परिसर, जिल्ह्यासह परराज्यातील कृषकांचे कृषिदैवत असलेल्या येथील श्री अष्टभुजा देवीमातेचा यात्रोत्सवास पौष शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजे २५ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, दुकाने येण्यास सुरवात झाली आहे.
ग्रामपंचायत तथा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे यात्रा नियोजनासाठी सर्वस्तरीय विशेष सभा होणार असून, मंदिराच्या रंगरंगोटीसह पूर्वतयारीला वेग आला आहे. (Pilgrimage of krushak dev deity in Mandane from Thursday nandurbar news)
देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या ‘चेतक फेस्टिव्हल’नंतर जिल्ह्यासह जवळील मध्य प्रदेश, गुजरातमधील भाविकांना मंदाणे येथील यात्रेची प्रतीक्षा असते.
येथील यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक मानली जाते. विविध फेस्टिव्हलच्या जगात आजही या यात्रेचे स्वरूप टिकून आहे. त्यामुळेच तीन राज्यांतील कृषकांचे मोठे श्रद्धास्थान येथील अष्टभुजा माता आहे.
कृषकांची या तिन्ही राज्यांत ही एकमेव देवी असल्याने तिला शाकंभरी मातादेखील संबोधले जाते. देवीच्या स्थापनेपासून आजपर्यंत या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ न आल्याने येथील कृषकांनी व ग्रामस्थांनी देवीचे पावित्र्य आजपावेतो जपले आहे.
यात्रेचे स्वरूप पाहता येथील यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येत असल्याने ही यात्रा जवळजवळ २० ते २२ दिवस सुरू असते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून व्यावसायिक व भाविक मोठ्या प्रमाणावर दर वर्षी हजेरी लावत असतात.
अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होते. यात्रेत धक्काबुक्की, चेंगराचेंगरी, वाहनांची कोंडी, अपघात, वीजजोडणी आदींतून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत विशेष अशी सर्वस्तरीय नियोजन बैठक घेण्यात येते.
यात्रेत येणाऱ्या भाविकांचे व व्यावसायिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभाग, वीजपुरवठा सोयीसाठी वीज वितरण कंपनी, महसूल विभाग, अग्निशमन विभाग अन्य विविध विभागांशी ग्रामपंचायतीमार्फत सुविधेसाठी पत्रव्यवहार व ठराव करण्यात आले आहेत.
रोषणाईसह पूर्वतयारीला वेग
यात्रेत विविध प्रकारच्या पाळण्यांसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटण्यात येत असतात. त्यासाठी यात्रेच्या ठिकाणी परिसर स्वच्छ व सपाटीकरण करण्यासाठी जेसबी व ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मंदिराला पाण्याने धुऊन मंदिरावर रोषणाई करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, मंदिर व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आदी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मेहनत घेत आहेत. यात्रेत येणाऱ्या सर्वधर्मीय व्यावसायिक व भाविकांची संख्या पाहता पोलिस विभागाकडून जादा कर्मचाऱ्यांची मागणी केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.