काय, पुन्हा आली परत टोळधाड, मग शेतक-यांनी कसली कंबर आणि केली उपाययोजना...

file
file

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यात दोन दिवसांपूर्वी आलेल्या टोळधाडीने संपूर्ण तालुका हादरून गेला. पण, काहीच नुकसान न करता टोळधाड तालुक्‍यातून हद्दपार झाली होती. तरी पण तालुका कृषी विभागाने त्या परत येण्याची शक्‍यता वर्तविली होती. आज (ता. 27) पुन्हा टोळधाड नरखेड तालुक्‍यातील बेलोना, माणिकवाडा, पिलापूर, मोहदी दळवी गोंडेगाव या शिवारात धडकली.

फवारणी करून पिटाळून लावले
शिवारात वाळवंटी टोळ किटकांचे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. टोळधाडीच्या पुनरागमनामुळे पुन्हा एकदा नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. नरखेड तालुक्‍यात दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथून अमरावती व वर्धा जिल्हामार्गे तालुक्‍याच्या उत्तर दिशेकडे काही गावात धाडीचे आगमन झाले होते. पण, काही वेळातच ती शेतकऱ्यांनी हाकलून लावली. त्याच दिवशी रात्री धाड काटोल तालुक्‍यात पोहोचल्यानंतर फवारणी करून काही टोळ कीटक मारण्यात आले होते. काही कीटकांनी पलायन केले होते. याचमुळे कृषी वेळोवेळी विविध माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना सजग राहण्याचे आवाहन करीत होते. संकट गंभीर असल्याने कृषी विभाग व शेतकरी सजग असल्यामुळेच आज पुन्हा आलेले टोळधाडीचे संकट शेतकऱ्यांनी धूर करून, मोठा आवाज करून व दगड मारून अवघ्या दहा मिनिटांत परतून लावले. यामुळे सध्यातरी बळीराजा नुकसानापासून बचावला.

वरूडमार्गी दाखल झाले
नरखेड तालुक्‍यात टोळधाडीचे संकट हे मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका मार्गी दाखल झाले होते. दुपारी शेतकऱ्यांना टोळधाडी आल्याचे कळताच तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना नानाविध साधनांचा वापर करून क्षणातच परतून लावले. पण त्या पुन्हा येणार नाही, हे सांगता येत नसल्याने कृषी विभागाने उपाययोजना करून ठेवल्या आहे. टोळधाडी या नरखेड तालुक्‍याला लागून असलेल्या मध्य प्रदेशमधील उमरी गावाजवळील तलावाजवळ रात्रीला मुक्काम करतील, असा कृषी विभागाने अंदाज वर्तविला आहे. किसनाजी पराते, सतीश बनाफर, प्रवीण शेंगर, मुन्ना राठोड, यांच्या शेतात तसेच परिसरात टोळ्यांच्या या धुमाकुळामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून, दुसरीकडे नियंत्रणासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतात खरीप किंवा रब्बी पिके नसल्याने पिकांच्या नुकसानाची शक्‍यता कमी असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. मात्र, संत्रा, मोसंबीच्या बागासह भाजीपाल्याच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

मौदा तालुक्‍यात शिरकाव
मौदा  : तालुक्‍यातील चाचेर, निमखेडा, आष्टी, अरोली, इंदोरा, खापरखेडा(तेली) शिवारात टोळधाडीचा शिरकाव झाला. टोळअळीचा मोर्चा भंडारा जिल्ह्यातील तुमसरकडे जाताना दिसला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शिवारात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन दक्ष राहण्याचे आवाहन केले.

दहा मिनिटांत अख्खे पिक उद्‌ध्वस्त करतात
जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुक्‍यांत टोळधाडीने शिरकाव करीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले आहे. टोळअळीचा कळप लाखोंच्या संख्येत असल्यामुळे पिकावर बसल्यानंतर 10 ते 30 मिनिटांत सर्व पीक उद्‌ध्वस्त करीत आहे. यावेळी शेतात उन्हाळी वांगे, टोमॅटो, पालेभाज्या व इतर पीक आहेत. त्याचप्रमाणे लिंबू, संत्रा, आंबे, चिक्कू या झाडांनासुद्धा या अळीने उद्‌ध्वस्त केले आहे. तालुक्‍यात शेतातील पाहणीकरिता कृषी सभापती तापेश्वर वैद्य, तालुका कृषी अधिकारी रविकांत वासनिक, जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोखंडे, कृषी सहायक देशमुख परिसरात आहेत, असे खापरखेडा (तेली) येथील शेतकरी सुरेश सुब्बराव सज्जा यांनी सांगितले.

संपूर्ण व्यवस्था तयार आहे.
त्या रात्री पुन्हा मुक्कामी तालुक्‍यात दाखल झाल्यास पंचाईत होऊ नये म्हणून फवारणीची संपूर्ण व्यवस्था तयार आहे. काही वेळातच त्यावर नियंत्रण मिळविता येईल.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com