नागपूर : सणासुदीच्या काळात रेल्वेतील प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली जात आहे. त्याच शृंखलेत नागपूरमार्गे प्रयागराज-यशवंतपूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
०४१३३ प्रयागराज-यशवंतपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २५ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी प्रयागराज येथून रवाना होईल. ही गाडी सोमवारी दुपारी ३.५० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि पाच मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे रवाना होईल. तसेच ०४१३४ यशवंतपूर-प्रयागराज साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ ऑक्टोबर ते २ डिसेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी यशवंतपूर येथून परतीच्या प्रवासाला निघेल.
ही गाडी गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नागपूरला पोहोचेल आणि पाच मिनिटाच्या थांब्यानंतर पुढे रवाना होईल. ही गाडी एकूण सहा फेऱ्या करणार आहे. या गाडीला एक प्रथम श्रेणी वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी वातानुकूलित, सहा तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लिपर, चार जनरल डबे राहतील.
प्रवाशांच्या सुविधेसाठी सध्या देशभरात विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात आहे. नरखेड-काचीगुडादरम्यानही सुपरफास्ट स्पेशल ट्रेन २३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ०७६४१ काचीगुडा-नरखेड विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक आठवड्यात मंगळवार ते रविवारदरम्यान रोज सकाळी ७.१० वाजता काचीगुडा येथून रवाना होईल आणि रात्री २३.१० वाजता नरखेडला पोहोचेल.
तसेच ०७६४२ नरखेड-काचीगुडा विशेष ट्रेन २४ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान आठवड्यातून बुधवार ते सोमवारदरम्यान धावेल. ही गाडी पहाटे ४.३० वाजता रवाना होऊन रात्री ८.१५ वाजता काचीगुडा स्थानक गाठेल. एकूण १८ डब्यांच्या या गडीला एक वातानुकूलित चेअर कार, पाच द्वितीय क्षेणी चेअर कार, दहा साधारण डबे राहतील.
नागपूरवरून धावणाऱ्या किसान ट्रेनला संत्रा उत्पादकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेही छिंदवाडा ते खडकपूर दरम्यान किसान रेल्वे चालविण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर बुधवारी पहिली फेरी सोडण्यात येईल. इतवारीमार्गे धावणाऱ्या या गाडीत शेतमालाच्या वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी किसान रेल्वे महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगालला जोडणार आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने देशातील कृषी उत्पादने देशाच्या विविध भागात पोहोचविण्याच्या दृष्टीने किसान रेल्वे चालविण्याचा येत आहे. छिंदवाडा-खडकपूर किसान स्पेशल ट्रेन बुधवारी छिंदवाडा येथून सकाळी ५.१० वाजता रवाना होईल.
इतवारी येथे सकाळी ९.०० वाजता पोहचेल तर खडगपूरला दुसऱ्या दिवशी ७.३० वाजता पोहचेल. या गाडीत सौंसर, सावनेर, इतवारी, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चाप्रा, रायगढ, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर व टाटानगर येथे आपला माल चढविता आणि उतरविता येऊ शकेल.
किसान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार असल्याने इतवारी-टाटानगरदरम्यान धावणारी कोविड-१९ स्पेशल पार्सल स्पेशल ट्रेन रद्द करण्यात आली. किसान रेलचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे, दुधाच्या वाहतूक शुल्कात ५० टक्के सवलत मिळणार आहे. एक क्विंटल मालासाठी केवळ ३०० रुपयांचा खर्च करावा लागेल.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.