अखेर आरोप तथ्यहीन; "त्या' विद्यार्थिनीचा मृत्यू अपघातानेच !

टेकाडी : पत्रकार परिषदेत उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार काळे.
टेकाडी : पत्रकार परिषदेत उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार काळे.

टेकाडी (जि.नागपूर)  : टेकाडी शिवाराअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग पुलाखालच्या निर्जनस्थळी रामटेकवरून नागपूर इतवारीसाठी परत जाणाऱ्या रेल्वेगाडीला धडकून कांद्री शंकरनगर येथील पंधरावर्षीय युवती रुही सतीश बेलेकर हिचा मृत्यू झाल्याची घटना 15जानेवारीला उघडकीस आली. यातील फिर्यादी संध्या बेलेकर यांनी रुही मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा संशय घेत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिस निरीक्षक काळे करत असल्याचा आरोप केला होता. परंतु रुहीचा मृत्यू अपघातच असून पोलिसांवर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी कन्हान पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

क्‍लिक करा  : पहाटे उठून सडा, रांगोळी टाकताय...ही घ्या काळजी...

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

पत्रकार परिषदेला उपस्थित उपविभागीय उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आणि कन्हान पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीत दिलेल्या माहितीनुसार रुही बेलेकर हिचा मृतदेह 15 जानेवारीला दुपारी रेल्वे रुळावर सापडला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रेल्वे अपघातातील फिर्यादी रेल्वेचालक यांच्यानुसार रुही रेल्वेला धडकून मृत झाली. शवविच्छेदनातदेखील तिच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादी संध्या सतीश बेलेकरकडून मृत रुहीच्या मोबाईल नंबरचा सीडीआर घेण्यात आला. सोबत परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेतला असता त्यात फिर्यादी संध्या बेलेकर यांनी तपासासाठी दिलेल्या काही नावांपैकी एक अल्पवयीन युवक घटनेच्या दिवशी तिच्यासोबत असल्याचा निदर्शनास आले.

"त्या' मुलाने भीतीपोटी काढला पळ
ज्याच्याकडून रुहीचा मोबाईल ताब्यात घेऊन विचारपूस केली असता घटनेच्या दिवशी दोघेही रेल्वे रुळावर बसून मोबाईलमध्ये व्यस्त होते. अचानक गाडी आली, त्यात कुणालाही काही कळण्याअगोदर हा अपघात झाला असून भीतीपोटी त्याने तिथून पळ काढला असल्याचे मुलाने सांगितले. तपास केला असता रेल्वेचालक आणि मुलाच्या बयानात साम्य आढळले असून यात कुठलाही घातपात नसून रुहीचा मृत्यू अपघातच असल्याचे स्पष्ट मत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी व्यक्त करत प्रकरणाला उगाच वेगळे वळण देण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन केले.

मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष द्या
अल्पवयीन मुलांना पालकांनी मोबाईल देताना विचार करूनच मोबाईल हाताळायला द्यावा. आपली मुले मोबाईलचा वापर कुठल्या कामासाठी करताहेत. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, दररोज मुलांचा मोबाईल पालकांनी चेक करावा. मुले मोबाईलचा गैरवापर किंवा कुण्या वाममार्गासाठी करत तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संजय पुज्जलवार
उपविभागीय पोलिस अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com